हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग
यवतमाळ (Yavatmal) :- देवनाळा नदीला पूर आला होता. या पुरामुळे यमुनाबाई यांचा अंत्यसंस्कार कसा करावा? असा प्रश्न सर्वांना पडला. शेवटी डोक्यावर तिरडी घेऊन नदीतून वाट काढत अंत्यसंस्कार करण्यात आला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात घडली. नदीवर पूल असता किंवा जोडमोहा गावात स्मशानभूमी असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.देशाला स्वातंत्र मिळून सात दशके लोटली आहे. परंतु अजून पायाभूत सुविधा सर्वत्र तयार झालेल्या नाहीत. ग्रामीण भागात रस्ते अन् पूल नसल्याची विदारक परिस्थिती अधूनमधून समोर येत असते. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून जावे लागते. काही ठिकाणी बस नसल्यामुळे पाच-दहा किलोमीटर चिमुकल्यांचा प्रवास होता. आता विदर्भातून मन सून्न करणाऱ्या दोन बातम्या आल्या आहेत. मृत्यूनंतर शेवटचा प्रवास सुखकर झालेला नाही. मृत्यू झालेल्या ७५ वर्षीय महिलेच्या आप्तेष्टांना पुराच्या पाण्यातून वाट काढत त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागला. ७५ वर्षीय महिलेचा शेवटचा प्रवासही मरणयातना सहन करणारा ठरला.
कळंब तालुक्यातील जोडमोहा गावातील यमुना नीळकंठ भोयर (७५) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. गावातील स्मशानभूमी देवनाळा नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे. या नदीवर पूल (river flood) झालेला नाही. यामुळे पावसाळ्यात कोणाचे निधन झाल्यास अन् देवनाळा नदी पूर असल्यास पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा न्यावी लागते. यामुळे सोमवारी यमुनाबाई यांच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून वाट काढत जावे लागले. त्या लोकांनी जिवावर उदार होत त्यांना अंतिम निरोप दिला.