पुढचा मुख्यमंत्री कोण?
अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे दोन आमदार निवडून आले. मात्र, विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा अद्याप रिक्त आहेत. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री कोण असतील यावर अजित पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. राज्यात प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी पक्षालाही विधानसभेच्या 288 जागांवरील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्याचा अधिकार आहे. अखेरीस महायुतीमध्ये जे जागावाटप होईल त्यानुसार उमेदवार दिले जातील असेही अजित पवार म्हणाले.
————
आमदार परत गेले तरी
अजितदादा यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधान परिषदेत विजय मिळाल्याने महायुतीत त्साह संचारला आहे. महायुतीचे नेते आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. अजितदादा गट तर विधानसभेच्या 288 जागांचा सर्व्हे करणार आहे. जेणेकरून पक्षाची ताकद कळणार असून त्यानुसार उमेदवार देता येणार आहेत. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्पष्ट केलं. तसेच 54 पेक्षा अधिक जागांवर आमचा दावा असेल असं अजितदादा गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच आमदारांबाबतचं एक मोठं विधानही त्यांनी केलं आहे.
————
सोयगावात बेफाम पावसामुळे तीन नद्यांना पूर
पाण्याचा अंदाज न आल्याने दोन बैलांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयगाव तालुक्यातील गावांना पुराचा फटका बसला आहे. यावेळी सोयगाव तालुक्यात झालेल्या बेफाम पावसामुळे नद्यांना पूर आला असून पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोयगाव तालुक्यातील तीन नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
——————-
मुख्यमंत्र्यांवर आम्हाला विश्वास नाही
लक्ष्मण हाकेंचं प्रतिपादन
ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी देखील पवारांनी आरक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावं असं आवाहान केलंय. मुख्यमंत्र्यांवर आम्हाला एक टक्क्याचाही विश्वास नाही. शरद पवारांनी मराठा समाजाला समजावलं तर तोडगा निघेल, असं थेट आवाहन हाके यांनी केलंय. छगन भुजबळांनी अचानक घेतलेल्या शरद पवारांची भेट घेत मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातलं वातावरण गढूळ झालं आहे, तुम्ही लक्ष घाला,असं आपण पवारांना सांगितलं, असा दावा भुजबळांनी केला आहे. त्या भेटीनंतर लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
————–
मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं काही नाही
भुजबळांचं वक्तव्य शिवसेनेला झोंबलं
छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी आरक्षणाच्या मुद्द्याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांना राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यसाठी लक्ष घालण्याची विनंती केली. तुम्ही राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहात. त्यामुळे इतर कोणापेक्षाही तुम्हालाच महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीची सूक्ष्म जाण आहे, असे भुजबळ यांनी म्हटले. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपेक्षा शरद पवार यांचे स्थान महत्त्वाचे असल्याचा एकप्रकारचा मेसेज गेला होता. हीच गोष्ट शिंदे गटाला खटकली आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी सोमवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केले.