मुंबई (Mumbai) :- देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. पहिल्याच दिवशी मविआने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत शपथविधीवर बहिष्कार टाकला. परंतु, त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. महाविकास आघाडीकडून कुणीही अध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने नार्वेकर बिनविरोध निवडून आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) मांडलेल्या प्रस्तावावर अनेक सदस्य बोलले. परंतु, आरआर आबांच्या रोहित पाटील यांनी विधानसभेतील आपले पहिलेच भाषण चांगलेच गाजवले.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्याचे माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांचे चिरंजीव रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील निवडून आले. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर रोहित पाटील यांनी पहिल्यांदाच विधानसभेत भाषण केले. रोहित पाटील (Rohit Patil) यांनी टोले लगावत, शाब्दिक कोट्या करत महायुतीवर निशाणा साधला.
या देशाचं वेगळेपण टिकून आहे. त्याचे कारण असे आहे की अनेक शाह्या या देशाने पाहिल्या. पण लोकशाही या देशाच्या वाट्याला आली, ज्यामुळे संबंध जगामध्ये आपले देश वेगळेपण टिकवून ठेवू शकले. त्याचे दुसरे कारण संसदीय पद्धत आपण कमावली, त्यामुळे लोकशाहीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. त्या एकमताच्या माध्यमातून जो अधिकार आपल्याला मिळाला त्यानुसार सदस्य येथे बसले आहेत. आपल्याला विनंती करेन की सर्वांत तरुण अध्यक्ष होण्याचा मान तुम्ही पटकावला आहे, तसा मी सर्वांत तरुण सदस्य म्हणून मान पटकावला आहे. मंत्रिमंडळाच्या या तरुण सदस्याकडे बारीक लक्ष असेल, अशी विनंती करतो. माझ्याकडे लक्ष असावे याचे कारण मी सुद्धा वकिली पूर्ण करतोय. एक नंबरवरच्या बाकावर असलेल्या वकिलाला जशी तुम्ही मदत करता, तशीच मलाही कराल,असे रोहित पाटील यांनी सांगितले.