23 नोव्हेंबरला मतमोजणी,कोणाचं किती संख्याबळ
मुंबई (Mumbai) :- गेल्या काही दिवसांपासून निवडणूक केव्हा जाहीर होणार आणि आचारसंहिता केव्हा लागणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता होती. याचदरम्यान आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.
महायुती – 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)
महाआघाडी – 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.