Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी

नागपूर : (१-७-२०२४)

आज जरी आपण अन्नधान्याने परिपूर्ण असलो तरी आगामी काळात अन्नधान्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे समाजाला वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून सोमवार, दिनांक १ जुलै २०२४ रोजी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. निंबाळकर मार्गदर्शन करीत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी भूषविले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, कुलसचिव डॉ राजू हिवसे, अधिसभा सदस्य डॉ. विजय इलोरकर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नितीन डोंगरवार यांची उपस्थिती होती. वीज कोठून येते, पिण्यास पाणी कोठून येते, हरितक्रांती म्हणजे काय? याची नवीन पिढीला माहिती व्हावी म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्याचे स्मरण आपण त्यांच्या जयंतीदिनी करीत असल्याचे डॉ. शरद निंबाळकर पुढे बोलताना म्हणाले. एक कुशल प्रशासक तसेच भारतातील कृषी क्रांतीला हातभार लावणारे हरीत क्रांती, धवलक्रांती आणि कृषी- औद्योगिक क्रांतीचे नाईक हे प्रणेते होते. ग्रामीण भागात वीज, पाण्याची सुविधा मिळावी म्हणून पंचायत राज या त्रिस्तरीय रचनेचे प्रणेते वसंतराव नाईक होते. त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू केली.

समाजाच्या खालच्या स्तरातून म्हणजेच वंचित घटकातून आलेले वसंतराव नाईक हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी होते, असे अभिमानाने सांगत याचे आपणास भूषण असावे असे डॉ. निंबाळकर म्हणाले. ‘एक एक पायरी चढत जावे, तुटक्या पायरी जवळ निराश होऊ नये, यशो मंदिर गाठावे आणि पहिल्या पायरीला विसरू नये’, असे वसंतराव नाईक यांचे व्यक्तिमत्व होते. समाजकारण करताना त्यांनी विरोधकांना देखील आपलेसे केले, याचे विदर्भवीर जाम्बुवंतराव धोटे यांच्याबाबत उदाहरण देत सांगितले. देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा असताना तत्कालीन कृषिमंत्री सुब्रमण्यन यांना अमेरिका तसेच रशिया समोर गयावया करावी लागली. अमेरिकेने रशियाला पाठविलेले धान्य त्यानंतर तेथून भारतात आले. अशाकाळी भारतात कृषी क्रांती होणे गरजेचे होते. त्यावेळी वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात हरितक्रांतीची प्रतिज्ञा घेतली. अन्नधान्य वाढले नाही तर शनिवार वाड्यासमोर फाशी घेईल, अशी घोषणा करणारे ते व्यक्तिमत्व होते. शेतकऱ्यांविषयी प्रचंड जाणीव असणारा आणि वन वन फिरणारा माणूस असल्याचे डॉ. निंबाळकर म्हणाले. कापसातून विविध उत्पादन घेत कृषी प्रक्रिया उद्योग निर्माण करण्याची लिलया त्यांनी केली. ४ कृषी विद्यापीठाची स्थापना केली असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कृषी सुधारणा होत आहेत. त्यांचे स्मरण करताना प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषण करताना माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी आपणाकडे विद्यार्थ्यांच्या रूपाने मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आहे. या मनुष्यबळाचा वापर समाज अर्थात देश सेवेसाठी वापरता येईल, असे प्रकल्प शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावे असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक समस्या शोधून त्यावर संशोधन करीत उपाय योजना कराव्या. या दृष्टीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केले आहे. यातून विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावरील समस्यांबाबत संशोधन करता येईल. शासनाने गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात अधिकार दिले आहेत. त्याचे अंमलबजावणीचे अधिकार देखील गावाला दिले आहे. त्यामुळे विद्यापीठाने मार्गदर्शकाची भूमिका निभवावी असे कुलगुरू म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. नितीन डोंगरवार यांनी कृषी दिन कार्यक्रम साजरा करण्यामागील पार्श्वभूमी सांगितली. अधिसभा सदस्य डॉ. विजय इलोरकर यांनी मनोगत व्यक्त करताना कृषी दिन विद्यापीठात साजरा व्हावा याबाबत प्रस्ताव पारित करून घेतल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ७५ टक्के नागरिकांचा व्यवसाय असलेल्या शेतीबाबत त्यातील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जागृती होईल, असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन मराठी विभागातील डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी मानले. कार्यक्रमाला अधिष्ठाता, विभाग प्रमुख, संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles