अहमदनगर : योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंती उत्सवानिमित्त यावर्षीचा राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार अहमदनगर येथील मिलिंद चवंडके व नारायण भाटे (पुणे) यांना जाहिर करण्यात आला आहे.तसेचडाॅ. धर्मवीर भारती (लातूर) यांची सामाजिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून गुरूवारी २३ मे रोजी दुपारी ४ वाजता शेवगांवमधील दादाजी वैशंपायननगर मध्ये पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती गुरूदत्त सामाजिक ,सांस्कृतिक,शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे अध्यक्ष अर्जुन फडके आणि सचिव फुलचंद रोकडे यांनी दिली.
ते म्हणाले, २०१० सालापासून प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान सोहळा योगतज्ञ संत दादाजी वैशंपायन यांच्या जयंतीस संपन्न होतो आहे.दादाजी वैशंपायन यांनी हिमालयामध्ये राहून खडतर तपश्चर्या केली.अष्टसिद्धी प्राप्त असूनही ते सामान्यांप्रमाणे राहत असत.१९२० साली बुद्ध पौर्णिमेस नेरे (तालुकापनवेल,जिल्हा रायगड) या गावी त्यांचा जन्म झाला.वयाच्या शंभराव्या वर्षी २० मे २०१९ या दिवशी त्यांनी देह त्याग केला.त्यांनी दैवी शक्तीच्या साह्याने दु:खी,कष्टी लोकांचे त्रास दूर केले.अंध, अपंग,मूकबधिर,गरजू विद्यार्थी,समाजसेवी संस्था तसेच मंदिराचा जिर्णोद्धार करणाऱ्या आणि अध्यात्म प्रसाराचे कार्य करणाऱ्या संस्थांना सढळ हाताने देणगी स्वरूपात ते मदत करत असत.दादाजींच्या जयंतीचे औचित्य साधून अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना प्रतीवर्षी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या नावे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.विशेष म्हणजे पुरस्कारा साठी प्रस्ताव न मागवता सातत्यपूर्ण निरपेक्ष कार्याची प्रत्यक्ष पाहणी करून निवड केली जाते.मिलिंद चवंडके यांनी श्रीक्षेत्र मढी येथील श्री कानिफनाथ संजीवन समाधी देवस्थानचे विश्वस्तपद भूषविताना गर्भगिरीतील पहिल्या नाथ संमेलनाचे आयोजन करून अध्यात्मिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
श्रीकानिफनाथमाहात्म्य या शुध्द मराठी तील ओवीबध्द रसाळ पोथीचे लेखन केले.९३ दिवसात नर्मदेची पायी परिक्रमा पूर्ण केली.राष्ट्रीय स्वयं सेवक संघ परिवारात ४० वर्षे विविध दायित्व सांभाळले.या एकूण कार्याची दखल घेऊन अध्यात्मिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.पुणे येथील श्रीस्वामी समर्थ कृपांकित नाना भाटे काकांनी स्वामी समर्थांच्या सुरेख मूर्ती हजारो स्वामी भक्तांना भेट देण्याचे कार्य करताना संजीवनी स्वामीकृपेची ही बखर आणि स्वामी वरद हा स्वामी भक्तांच्या अनुभवांचा अंक प्रकाशित करून स्वामीकृपेच्या अनुभूती आजही भक्तांना येत असल्याचे दाखवून दिले आहे.अंधश्रध्दा नसावी मात्र श्रध्दा असावी,हे सांगणारे भाटेकाका हजारो स्वामी भक्तांचे प्रेरणास्थान आहेत.यावर्षीच्या अध्यात्मिक पुरस्कारासाठी भाटे यांची निवड करण्यात आली आहे.तसेचडाॅ. धर्मवीर भारती हे लातूर येथील निश्चल पुरी फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत.त्यांनी बांधकाम व्यवसाय क्षेत्रात डाॅक्टर पदवी संपादन केली आहे.गेल्या १३ वर्षांपासून ते प्रतीवर्षी १५६ विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतात.२१ जोडप्यांचे सामुदायिक विवाह त्यांनी केले.तीन गोशाळा उभारून भारतीय गोवंशाच्या संरक्षण आणि संवर्धनाचे मौलिक कार्य सुरू ठेवले आहे.डाॅ.धर्मवीर भारती (लातूर) यांची सामाजिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.नाशिक येथील गजानन कस्तुरे आणि मुंबई येथील एमएसडीएल वित्त विभागाचे संचालक अनुदिप दिघे यांच्या हस्ते हे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या सोहळ्यास आ.मोनिका राजळे,माजी आ.चंद्रशेखर घुले,रिलायन्स ट्रस्टचे व्हाईस प्रेसिडेंट गणेश राममुर्ती,तहसिलदार प्रशांत सांगडे, शरद वैशंपायन,प्राचार्य डाॅ.महेंद्र गौशाल (बीड),उदय देशपांडे (नाशिक),रविंद्र पुसाळकर व प्रशांत दिघे (मुंबई),सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित रहाणार आहेत.या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित रहावे,असे आवाहन गुरूदत्त संस्थेचे अध्यक्ष अर्जुन फडके,सचिव फुलचंद रोकडे आणि पी.बी.शिंदे यांनी केले आहे.