केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर
लालबागच्या राजाचे घेणार दर्शन
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरून चांगलीच खणाखणी सुरू आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून दावे प्रतिदावे केले जात असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच गणेशोत्सव सुरू असल्याने मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. आज अमित शाह लालबागच्या दर्शनाला पोहोचणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यामध्ये महायुतीच्या जागावाटपावरून निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
———
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठकीत रात्री उशीरापर्यंत राजकीय खलबतं
अमित शाहांकडून 7 महत्त्वाचे सल्ले
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत अमित शाह यांनी महायुतीच्या नेत्यांनी महत्त्वाच्या सूचना आणि सल्ले दिले. लोकसभा निवडणुकीच्या काळातील चुका टाळा. विधानसभेच्या उमेदवारांची निवड करताना विनिंग मेरिट हाच निकष डोळ्यांमसोर ठेवा, असे अमित शाह यांनी महायुतीच्या नेत्यांना सांगितले.
——–
बॉम्बे नको मुंबई नाव हवं
अमित शाह यांची मागणी
“बॉम्बे नको मुंबई नाव हवं आहे ही मागणी ज्यावेळी केली गेली. मी देखील बॉम्बे नको मुंबई हवी ही मागणी करणारा होतो. त्यावेळी मुंबई समाचारने हेडलाईन केली होती की मुंबईच हवं. नवीन शैक्षणिक धोरणात आम्ही मातृभाषा अनिवार्य करणार आहोत. आम्हाला माहिती आहे की याला प्रचंड विरोध होईल, मात्र आम्ही तरी देखील हा निर्णय घेणार आहोत”, असं गृहमंत्री अमित शाह म्हणाले. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.
अजित डोभालांचे मिशन रशिया-युक्रेन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवली विशेष जबाबदारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याची ‘सिक्रेट’ जबाबदारी सोपवविल्याचे वृत्त आहे. रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्याच्या दृष्टीने या आठवड्यात अजित डोभाल रशिया दौरा करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या महिन्यात रशिया आणि युक्रेनचा दौरा करून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी युद्ध थांबवण्यावर चर्चा केली होती. त्यानंतर जगाच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत. झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्यानंतर मोदी यांनी २७ ऑगस्ट रोजी व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यात मोदींनी युद्ध संपुष्टात आणण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेवर भर दिला. याच फोन कॉलदरम्यान डोभाल शांतता चर्चेसाठी मॉस्कोला जातील, असे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.
———
सुरतच्या गणेश मंडपावर दगडफेक
33 जणांना अटक
सुरतच्या लालगेट भागात गणेश उत्सवादरम्यान रविवारी रात्री उशिरा ६ तरुणांनी मंडपावर दगडफेक केली. याच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले.दगडफेक करणाऱ्या सहाही जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय दगडफेकीच्या घटनेचे समर्थन करणाऱ्या 27 जणांनाही अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अटक करण्यात आलेले लोक इतर धर्माचे आहेत, लोकांच्या निषेधाला रात्री उशिरा हिंसक वळण लागले. दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये हाणामारीही झाली. वाहनांची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली.शांततेचे आवाहन करण्यासाठी आलेल्या स्थानिक आमदार कांती बलार आणि पोलिसांशीही बाचाबाची झाली. डीसीपी विजय सिंह गुर्जर आणि त्यांच्यासोबत असलेले आणखी एक पोलिस अधिकारी जखमी झाले.
————-
1,2,3 नाही तर 10 नवीन ‘वंदे भारत ट्रेन’ येणार
PM मोदी 15 सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार
2019 साली ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पहिली Vande Bharat Express Train सुरू करण्यात आली आणि भारताने एक नवा इतिहास घडविला. तेव्हापासून भारतात या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा विस्तार वेगाने होत आहे. देशभरातील अनेक मार्गांवर ही सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 सप्टेंबर रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथून देशातील विविध राज्यांसाठी आणखी 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये पुणे-नागपूर वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे.
——–
म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली
मुख्यमंत्री शिंदेंनी सविस्तरपणे सांगितलं कारण!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मागील काही महिन्यांपासून राज्यभरात मोठी चर्चा आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत जमा झाल्याने सरकारसाठी ही योजना गेमचेंजर ठरणार का, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसंच दुसरीकडे, राजकीय लाभ डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीपूर्वी ही योजना आणली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काल आळंदी इथं झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू करण्यामागील कारण सांगितलं आहे. आम्ही नियोजन करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आपणदेखील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. आपल्यालाही गरिबी माहिती आहे. आपल्या स्तरावरचे अर्थकारण सांभाळणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते. म्हणून ही योजना सुरू केली. माझी लाडकी बहीण योजनेसाठी वर्षभराची तरतूद केली असून दरमहा निश्चित रक्कम मिळणार आहे,” असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे
————-