Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

काँग्रेसी अपप्रचाराला बळी पडू नका : गृहमंत्री अमित शाह

‘बहुमताचा वापर करून भाजपाने देशाचा विकास केला ‘!

अकोला येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आवाहन

भाजपाला 400 हून अधिक जागांवर विजय मिळाला तर संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार, असा अपप्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. या अपप्रचाराला बळी पडू नका, गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने आरक्षण रद्द केले नाही, तर बहुमताचा वापर करून 370 कलम रद्द केले, दहशतवाद संपविला, तिहेरी तलाक प्रथा रद्द केली आणि सीएए कायदा जारी करण्यासाठी बहुमताचा उपयोग केला. जोपर्यंत देशात भारतीय जनता पार्टी आहे, तोवर एससी, एसटी व ओबीसींचे आरक्षण कोणीही रद्द करू शकणार नाही, ही मोदींची गॅरंटी आहे, अशी ग्वाही आज केंद्रीय गृहमंत्री व भाजपा नेते अमित शाह यांनी मंगळवारी दिली.

अकोला येथे भाजपा उमेदवार अनुप संजय धोत्रे यांच्या प्रचार सभेत बोलताना प्रारंभी अमित शाह यांनी प्रचंड समुदायाकडून विजय संकल्पाचा उच्चार करवून घेतला आणि सभेत जय श्रीरामाचा जयघोषही उमटला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर, आ.संजय कुटे, आ.प्रकाश भारसाकळे, आ.वसंत खंडेलवाल, राष्ट्रवादीचे नेते आ.अमोल मिटकरी, शिवसेनेच्या खा.भावना गवळी, आ.श्वेता महाले आदी नेते मंचावर उपस्थित होते.

श्री.शाह म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिराला काँग्रेसचा व इंडी आघाडीचा कायमच विरोध होता. त्यामुळेच स्वातंत्र्य मिळून 70 वर्षानंतरही काँग्रेस व त्यांच्या आघाडीने अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न लोंबकळत ठेवला. सत्तेवर आल्यानंतर पाच वर्षांतच मोदी यांनी राम मंदिराची उभारणी केली, आणि रामलल्लाची प्रतिष्ठापनाही करून मोदी यांनी रामभक्तांची अनेक दशकांची इच्छाही पूर्ण केली. विकासाची कावडयात्रा खांद्यावर घेऊन मोदीजी देशाचा कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत. दहा वर्षांत मोदीजींनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. पुन्हा सत्तेवर आल्यावर पाच वर्षांतच अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येणार असून याचा फायदा, दलित, आदिवासी, वंचित, उपेक्षित, सर्वांना होणार आहे. म्हणूनच, मोदीजींच्या झोळीत मतांचे दान टाकून भाजपाला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही श्री.शाह यांनी केले. अनुप धोत्रे यांच्यासाठी दिले जाणारे एकएक मत मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणारे ठरणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रातील एकएक तरुण काश्मीरसाठी प्राण देण्यास सिद्ध आहे, पण काँग्रेसला याची जाणीवच नाही. कलम 370 रद्द करून मोदीजींनी काश्मीरला भारताचा कायमसाठी अविभाज्य भाग बनविला, तर काँग्रेस मात्र कलम 370 ला एखाद्या अनौरस अपत्याप्रमाणे कवटाळून बसली होती, अशी टीकाही शाह यांनी केली. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसविल्यावर 5 ऑगस्ट 2019 ला मोदींनी कलम 370 रद्द केले. दहा वर्षे सोनिया-मनमोहनसिंह यांचे सरकार होते, शरद पवार हे त्यांच्या सरकारात मंत्री होते, त्यांच्या काळात पाकिस्तानातून येऊन अतिरेकी भारतात बॉम्बस्फोट करून आरामात निघून जात होते आणि काँग्रेस मात्र हातावर हात घेऊन स्वस्थ बसत होती. मोदीजी सत्तेवर आले आणि पुलवामावर केलेल्या हल्ल्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा धडा त्यांनी शिकविला. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करून मोदींनी दहशतवादाचा सफाया केला. महाराष्ट्राला नक्षलवादापासून मुक्त करण्याचे काम मोदीजींनी केले. काँग्रेस सत्तेवर आली तर तिहेरी तलाक पुन्हा सुरू करण्याची काँग्रेसची भूमिका आहे. पण काँग्रेसला पुन्हा सत्ता द्यायची नाही असा निश्चय जनतेनेच केला आहे, असे सांगून शाह यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीतील जनहिताच्या कामांचा संपूर्ण तपशील सभेपुढे ठेवला. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर सत्तर वर्षांवरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार, घरोघर पाईपद्वारे गॅस जोडणी ही मोदी सरकारची गॅरंटी आहे, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles