भाविकांची हुल्लडबाजी आणि बालाजी मंदिर प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत तिरुमल्ला येथे सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रत्येक शहरांमध्ये प्रति बालाजी मंदिरे असताना इतक्या गर्दीच्यावेळी जाऊन जीव धोक्यात घालण्याची गरज काय, हा प्रश्न भाविकांनी आता स्वतःलाच विचारावा.
दुदैवी घटना कशामुळे घडली?
भाविकांना मंदिराजवळच्या बैरागी पट्टिडा पार्कमध्ये रांगेत उभे राहण्यास सांगण्यात आले होते, तिथे 4000 हून अधिक भाविकांची गर्दी होती. साहजिकच काऊंटर उघडल्यावर अरुंद वाटेने पुढे जाण्याच्या शर्यतीत गोंधळ उडाला आणि लोक पळताना एकमेकांना तुडवत गेले. या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रेत 2005 साली आग आणि चेंगराचेंगरीत 340 जणांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्राला ती हृदय हेलावून टाकणारी दुर्घटना आठवली.
मंदिर प्रशासनाचा खुलासा
वास्तविक मंदिर प्रशासनाच्या मते, दर्शनासाठी तिकिट टोकन घेण्यासाठी 91 काउंटर उघडण्यात आले होते. ही संख्या पुरेशी होती आणि केवळ भाविकांच्या हुल्लडबाजीमुळे ही दुर्दैवी घटना घडली. रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर, संबंधित महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी दरवाजा उघडताच चेंगराचेंगरी झाली. पण दुर्घटनेचे व्हिडिओ पाहता, भाविकांना टोकन काऊंटरजवळ जायला ठेवलेली अरुंद जागा हे दुर्घटनेचे मूळ कारण वाटते. शिवाय 4000 हून अधिक भाविक एकाचवेळी टोकन घेण्यासाठी एक दिवस आधीपासून रांगेत उभे राहिले होते, हा पण मंदिर प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे.
वारंवार अशा घटना घडतात कश्या?
1. सार्वजनिक सुट्ट्यांमुळे अशा प्रसिध्द मंदिरात एकावेळी हजारोंच्या संख्येने भाविक जमा होतात, त्यावर मंदिर प्रशासनाचा अंकुश नाही.
2. प्रसिद्ध मंदिरांनी नवलौकीकाच्या मानाने भाविकांना बाकी सुविधा दिल्या, पण दर्शन प्रक्रियेत कुठलीच सुसूत्रता आढळत नाही. यापूर्वी इंदूरच्या स्नेहनगर येथील बेलेश्वर मंदिरात विहिरीचे छत गर्दीचा दबाव सहन करू न शकल्याने वर बसलेल्या भाविकांसह खोल विहिरीत पडले.
3. राजकीय नेते, चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द कलाकार यांच्या भेटीमुळे मंदिरात भाविकांची गर्दी वाढते आणि अशा घटना घडतात.
4. अति उत्साही आणि हुल्लडबाज भाविकांमुळे मुद्दाम असे प्रकार घडवून आणले जातात.
5. भाविकांमध्ये झालेल्या अफरातफरीचा फायदा घेण्याचा उद्देश असलेल्या चोरट्यांचाही यात सहभाग असतो.
6. दर्शन प्रकारामुळे तास न्? तास तातकळत थांबलेल्या भाविकांचा उद्रेक होतो.
प्रशासनाच्या कार्यात सुसूत्रता कधी येणार?
अशा दुर्घटना घडल्यावर, मृत भाविकांच्या कुटुंबीयांना तुटपुंजी आर्थिक मदत, जखमींना उपचार देण्यापलीकडे राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा, सत्तारूढ पक्षाचे नेते असतील, दुसरे काहीही करत नाहीत. एका मंदिराचा असा दुर्दैवी अनुभव पाहून दुसऱ्या मंदिराचे व्यवस्थापन, दर्शन प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने काहीही बदल करताना दिसत नाही.
अशा दुर्दैवी घटना कशा टाळता येतील?
1. बऱ्याचदा धार्मिक स्थळांवर राजकीय हस्तक्षेप आणि त्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर बंद होणे गरजेचे आहे. तर अशा ठिकाणी कडक नियम लागू करता येतील.
2. नियमावली, मार्गदर्शक तत्वे तंतोतंत पाळली गेली तर अशा दुर्घटना टाळता येतील. धार्मिक स्थळी होणाऱ्या गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये या प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत, कडक नियम आहेत त्यांची काटेकोर अंमलबजावणी व्यवस्थापनाकडून झाली पाहिजे.
3. मंदिर प्रशासनाच्या प्रभावी नियोजनाद्वारे, पुरेसे कार्यक्षम कर्मचारी आणि स्वयंसेवकांद्वारे अशा धार्मिक स्थळांची दर्शन व्यवस्था निर्धोकपणे राबवता येईल.
एकूणच मतितार्थ
मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थेत बाधा न आणता धार्मिक स्थळी भक्तिभावाने, आणि शांततेच्या मार्गाने दर्शन प्रक्रियेत आपलाही सहभाग दाखवणे ही आलेल्या भाविकांची खरी जबाबदारी आहे. ती पाळली तर सगळ्याच यांत्रणांवरचा ताण कमी होऊन त्या भविकांच्याच सेवेसाठी अधिक प्रभावीपणे काम करू शकतील.