150 टन कुंकवाची निर्मिती पूर्ण
पंढरपूर :- यंदा राज्यातील अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस सुरु झाल्याने बळीराजा पेरण्या उरकून मोठ्या संख्येने आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघाला आहे. दरवर्षीपेक्षा यंदाच्या यात्रेत दीडपट भाविक जास्त येण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कुंकू, बुक्का तयार करून ठेवला आहे. यातच विठ्ठल मंदिराला मिळालेले 700 वर्षापूर्वीचे रुप हे भाविकांसाठी मोठं आकर्षण असून ज्ञानोबा, तुकारामांच्या काळातील मंदिर कसे असेल हे पाहण्यासाठी यंदा भाविक मोठ्या संख्यने पंढरीजवळ पोहोचू लागले आहेत.
आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक येथून नेहमीच सौभाग्यालंकार म्हणून ओळखले जाणारे कुंकू आणि विठुरायाचा बुक्का खरेदी करण्यास प्राधान्य देत असतो. विशेषतः महिला भाविक यात्रा संपवून जाताना कुंकू, बुक्का, अष्टगंध, चंदनाची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांकडून जवळपास 150 टन कुंकू आषाढीच्या काळात लागत असतो. अशा वेळी वर्षभर बनवूनही तेवढे कुंकू तयार करण्याची ताकद येथील कारखानदारात नसल्याने राज्यभरातून येथे कुंकवाची आयात होत असते. मात्र, कुंकू खरेदी करताना चोखंदळ भाविक हळदीपासून बनविलेल्या म्हणजेच पिंजर कुंकवाला पसंती देत असल्याने हे पहिल्या दर्जाचे कुंकू पंढरपूरमध्येच मोठ्या प्रमाणात बनविले जाते. याचप्रमाणे बनविलेले कुंकू भाविकांना आकर्षिक करण्यासाठी मोठमोठ्या परातीत साधारण 800 ते एक हजार किलो कुंकवाचे मोठे ढीग बनवून ठेवण्यात येतात. याला पंढरपुरी भाषेत ‘परात लावणे’ असं म्हणतात. पंढरपूरचा कुंकू हे बाजारपेठेचे एक वैशिष्ट्य असते. ग्राहक आल्यावर याच कुंकवाच्या डोंगरातील मागे असणारे कुंकू भाविकांना दिले जाते. कोणत्याही दुकानात गेला तरी अशा पराती लावण्याची पद्धत इथे दिसून येते. ही परात लावण्यासाठी किमान 4 ते 5 तास अतिशय सहनशक्ती ठेवून बारकाईने हे काम केले जाते. या पराती लावून त्यातील कुंकू मागच्या बाजूने काढून भाविकांना विकताना हा उंच ढीग ढासळणार नाही याचीही काळजी घेतली जाते.