महाविकास आघाडीला रोखण्यासाठी शेतकरी कर्जमाफीचे अस्त्र,
अजित पवार-अमित शाह दिल्ली भेटीत काय ठरले?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला. महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली. महाविकास आघाडीत काँग्रेसला 13, शिवसेना ठाकरे गटाला 9 तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीत परिस्थिती बदलण्यासाठी महायुतीने प्रयत्न सुरु केले आहे. त्यासाठी राज्यभरातील महिलांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. ही योजना जाहीर होताच राज्यभरातील तहसील कार्यालये आणि सेतू केंद्रावर महिलांची गर्दी होत आहे. आता महाविकास आघाडीकडून निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीने शेतकरी कर्जमाफीवर विचार सुरु केला आहे. त्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
—————
शरद पवारांनी जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला,
सदाभाऊ खोत यांचे गंभीर आरोप
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवलाय. महायुतीकडून 9 उमेदवारांनी अर्ज भरला होता, या सर्वच उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीची मतं फुटली नसती तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले नसते आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला नसता. जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान, आता जयंत पाटील यांच्या पराभवानंतर विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वे शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनी जयंत पाटलांच्या पाठित खंजीर खुपसलाय, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
————–
लग्नासाठी कुणी मुलगी देईना! जमलं तर एखादी लाडका भाऊ योजना आणा;
शेतकरी पुत्रानं वेधलं सर्वांचं लक्ष
शेतकर्यांच्या मुलांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होईना. मुख्यमंत्री साहेब जमलं तर एखादी लाडका भाऊ योजना सुद्धा नक्की आणा. अशी मागणी केली आहे भंडाऱ्याच्या एका शेतकरी पुत्राने. शेतकर्यांच्या मुलांचे काही कल्याण होईल, अशी एखादी योजना काढावी आणि तरुणांसह शेतकरी पुत्रांनाही दिलासा द्यावा, यासाठी या युवा शेतकरी पठ्ठ्यानं चक्क हातात फलक घेत गावाच्या चौकात उभा राहून सऱ्यांचे लक्ष वेधले आहे. हातात फलक घेऊन त्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केली आहे.
————
पनीर खरेदी करताना सावधान!
‘एफडीए’कडून तब्बल 314 किलो बनावट पनीर जप्त,
सिन्नर येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील दुध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या मे. यशवी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस, मुसळगाव एमआयडीसी, या कंपनीत गुरुवारी सायंकाळी धाड टाकून 314 किलो भेसळयुक्त पनीरसह भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा साठा जप्त केला.नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून भेसळयुक्त अन्न पदार्थांच्या विरोधात अन्न, औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून कार्यालयास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड टाकली असता त्याठिकाणी भेसळयुक्त पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरु असल्याचे आढळले.
———–
क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांविरोधात सहा वर्षासाठीच्या निलंबनाची कारवाई करा
काँग्रेसच्या आमदाराची मागणी
काँग्रेस आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या निर्देशांच्या विरोधात मतदान केलंय, त्यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी कोणाला मतदान केलंय, कोणी पक्षाच्या निर्देशानुसार मतदान केले आहे आणि कोणी पक्षादेश धुडकावून क्रॉस वोटिंग केलंय, हे पक्षाच्या निरीक्षकांच्या सहज लक्षात आलं असेल. अशा क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांविरोधात सहा वर्षासाठीच्या निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे.
————–
उड्डाण पुलावरून खाली कोसळून दुचाकी स्वाराचा मृत्यू
उपराजधानीत अपघातांचे सत्र सुरूच
नागपुरात पुन्हा एकदा उड्डाण पुलावरून खाली कोसळून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या पारडी उड्डाण पुलावर आज दुपारच्या सुमारास ही घटना घडलीय. यात एक बाईकस्वार तरुण चिखलीवरून पारडीच्या दिशेने जात असताना तीव्र गतीमुळे त्या तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकी उड्डाणपुलाच्या भिंतीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेमुळे दुचाकी पुलावर राहिली, मात्र तो तरुण उड्डाण पुलाखाली कोसळलाय. सुमारे 50 फूट उंचावरून खाली पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला
होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचार दरम्यान या तरुणाला मृत झाल्याचे घोषीत केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नागपुरात पुन्हा घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे