कोरोनाचे सहा रुग्ण आढळले
अमरावती शहरात कोरोनाचे पुनरागमन
अमरावती शहरात नव्याने सहा कोरोना पॉझिटिव्ह, तर एक रुग्ण स्वाइन फ्लूचा आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या नमुने चाचणीच्या अहवालातून ही बाब निदर्शनास आली आहे. त्याअनुषंगाने आरोग्य यंत्रणेने उपाययोजना आखण्यास प्रारंभ केला असून, नमुने तपासणीवर भर दिला जाणार आहे. जिल्हा आरोग्य यत्रणेकडून २४ ते ३० जुलै दरम्यान एकूण १४० जणांचे मुने चाचणीसाठी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पाठविले असता यात सहाजण कोरोना पॉझिटिव्ह, तर एक रुग्ण स्वाइन फ्लूचा आढळला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या ६० वर्षीय रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
——————–
विधानभवनावर फडकवणार स्वतंत्र विदर्भाचा झेंडा
विदर्भवादी 10 ऑगस्टला विदर्भ राज्य आंदोलन
गेल्या अनेक वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे, यासाठी विविध व्यासपीठावर मागणी करून आणि 12 वर्षापासून सतत अनेक जनआंदोलने करून विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ राज्याची मागणी तीव्र केली आहे. आता विदर्भ राज्य आंदोलन समिती १० ऑगस्ट रोजी विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवणार आहेत.
——————–
तर मी राजकारण सोडून देईन
अजित पवार चांगलेच संतापले
माझी बदनामी करणं, सातत्याने गैरसमज निर्माण करणं असा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. ज्यांनी कुठलाही पुरावा नसताना संसदेपासून इथपर्यंत माझ्यावर वेश बदलून प्रवास केल्याचे आरोप केलेत. त्यांनी हे आरोप सिद्ध करावेत. जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी. हे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन असं मोठं विधान करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
——————–
कल्याणमध्ये मोठं होर्डिंग कोसळलं
अनेक गाड्यांचे नुकसान, दोन जण जखमी
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेला तीन महिने पूर्ण होण्याआधीच आता कल्याणमध्येही होर्डिंग कोसळल्याची घटना घटली आहे. कल्याण पश्चिम येथील सहजानंद चौकात भले मोठे होर्डिंग कोसळले आहे. या घटनेत गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर दोनजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण मधील सहजानंद चौकात भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत होर्डिंग खाली उभे असलेल्या गाड्यांचं नुकसान झालं तर दोन जण किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.
नामांतर प्रकरणी याचिका फेटाळली
हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव (Chhatrapati Sambhajinagar and Dharashiv) नामांतर प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या नामांतर प्रकरणातील याचिका फेटाळण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने राज्याला दिलेला आहे. याशिवाय नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात अशी परिस्थिती असते, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.