Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

शेणखताला सोन्याचा भाव, शेतकरी मालामाल

शेती पिकांना रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर पीक जोमात येते हे खरे असले, तरी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो आणि पुढे शेतीमधून निघणारे उत्पन्नदेखील समाधानकारक मिळत नाही. त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांची पावले पुन्हा नैसर्गिक आणि विषमुक्त शेतीकडे वळताना दिसून येत आहेत. यासाठी शेतकरी शेणखतांचा वापर करताना दिसत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी राखलेल्या शेणखतालादेखील चांगली मागणी वाढली आहे. एक मोठी ट्रॉली शेणखतासाठी ४ ते ६ हजार रुपये मोजावे लागत आहेत.

दरवर्षी गुढीपाडवा झाला की, शेतकरी नव्याने शेती नांगरट करणे, पलटी मारणे, रोटर फिरवणे, तापलेल्या शेतातून गवत, काडी वेचून एका ठिकाणी जमा करणे, अशा शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलेला असतो. सोबतच शेतामध्ये शेणखत टाकणे, शेळ्या-मेंढ्या बसवणे अशी कामे सुरू असतात. दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत. महागडे खत घेण्यास शेतकरी धजावत नाहीत. तसेच रासायनिक खताने जमिनीचा पोत खराब होतो. यामुळे बहुंताश शेतकरी आता शेणखत घालण्यास प्राधान्य देत आहेत.

एकदा शेतात शेणखत टाकले की, किमान तीन वर्षे शेती चांगली पिकते, तसेच जमीन भुसभुशीत होऊन पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होतो. परिणामी उत्पन्नातदेखील वाढ होते, असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. एक ट्रॉली शेणखतासाठी ५ हजार रुपये आणि भरण्यासाठी ७०० रुपये मजुरी, असे किमान ५ हजार ७०० रुपये मोजावे लागतात, तर एक हायवा टिप्परसाठी २२ हजार रुपये मोजावे लागतात. स्थानिकांना गावात शेणखत मिळत नसल्याने अनेक शेतकरी इतर ठिकाणांहून शेणखत विकत आणत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles