टेक ऑफ करतांना विमान कोसळले
नेपाळमध्ये विमान दुर्घटना; १८ प्रवासी ठार
नेपाळमधील काठमांडू येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. बुधवारी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सचे विमान टेकऑफ दरम्यान कोसळले. या अपघातात किमान १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, पोखरा जाणाऱ्या विमानात एअरक्रूसह १९ जण होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पोलीस आणि अग्निशमन दल अपघातस्थळी पोहोचले आहे. बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघातात विमानाचा चक्काचूर झाला असून प्रवाशांच्या जीविताची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे.
———-
ठाकरे, पवारांना तुरुंगात डांबण्याचा कट
श्याम मानव यांच्या दाव्याने खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोट्या प्रकरणांत तुरुंगात डांबण्याचा डाव होता. पण तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंबंधीच्या एका प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यामुळे हे दोघे वाचले.असा खळबळजनक दावा श्याम मानव यांनी केला. राज्यातील चार बड्या नेत्यांना कारागृहात टाकण्याचा डाव आखण्यात आला होता. त्यात शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, शिवसेना उबाठा नेते अनिल परब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यामार्फत या चौघांना कारागृहात टाकण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु अनिल देशमुख यांनी त्या चार प्रतिज्ञापत्रावर सही केली नाही, यामुळे हे चौघे नेते वाचले आणि अनिल देशमुख कारागृहात गेले, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान या आरोपांना अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.
——–
मध्यरात्री अजित पवारांची दिल्लीवारी
राज्यातील राजकारणात घडामोडींना आला वेग
अजित पवार यांच्या कालच्या धावत्या दिल्ली दौऱ्याचे पडसाद राज्यातील राजकारणात उमटत आहे. मध्यरात्री अजित पवार यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. त्यावेळी त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे पण उपस्थित होते. रात्री एक वाजता ही भेट झाल्याने राज्यात अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. ही चर्चा 40-45 मिनिटं चालली. इतक्या मध्यरात्री झालेल्या या भेटीत काय घडामोड घडली याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अवघ्या सात तासांच्या या दौऱ्याने राज्यात एकच चर्चा रंगली आहे.
वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर
भंडारा, गडचिरोली, चंद्रपुरात सतर्कतेचा इशारा
मध्यप्रदेशात होत असलेल्या पावसामुळे संजय सरोवर, पुजारी टोला आणि धापेवाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे भंडारा शहरातून वाहणारी वैनगंगा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. वैनगंगा नदीची धोक्याची पातळी 245.50 ही मध्यरात्री ओलांडली आहे. भंडारा जिल्ह्यात मागिल चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पावसाची संततधार सुरू असल्याने वैनगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे भंडारा जवळील कारधा छोट्या पुलावर पाणी असल्याने हा पुल बंद करण्यात आला आहे.
——–
20 ऑगस्टला काँग्रेसचे मुंबईत अधिवेशन
भाजपला देणार जोरदार प्रत्युत्तर
२० ऑगस्टला मुंबईत काँग्रेसच अधिवेशन होण्याची शक्यता आहे . या अधिवेशनात कांग्रेस विधान सभेचं रणशिंग फुंकणार आहेत. काल दिल्लीत दिवसभर नाना पटोले यांची काँग्रेस नेत्यांशी चर्चा सुरु होती. या अधिवेशनाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
———
मध्यरात्री अजित पवारांची दिल्लीवारी
अमित शाह यांच्याशी खलबतं
अजित पवार यांच्या कालच्या धावत्या दिल्ली दौऱ्याचे पडसाद राज्यातील राजकारणात उमटत आहे. मध्यरात्री अजित पवार यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. त्यावेळी त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे पण उपस्थित होते. रात्री एक वाजता ही भेट झाल्याने राज्यात अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. ही चर्चा 40-45 मिनिटं चालली. इतक्या मध्यरात्री झालेल्या या भेटीत काय घडामोड घडली याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अवघ्या सात तासांच्या या दौऱ्याने राज्यात एकच चर्चा रंगली आहे.
———
जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा!
सहकाऱ्यांच्या आग्रहानंतर लावली सलाईन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांनंतर उपोषणा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटलांवर रात्री उपचार करण्यात आले. सहकाऱ्यांच्या आग्रहानंतर जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं. रात्री सलाईन लावण्यात आल्यानंतर सकाळी पुन्हा सलाईन काढण्यात आलं. मात्र सलाईन लावल्याचं आपल्या लक्षात आलं नाही. आता सलाईन लावल्यानंतर उपोषण करण्यात काय अर्थ आहे? असं म्हणत आपण उपोषण मागे घेत असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं.