अधिवेशनाचा कालावधी एक दिवस वाढवावा
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची मागणी
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज बारावा दिवस आहे. बुधवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळाचे दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आले. आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बिठकीला विरोधकांनी दांडी मारल्याने सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी एक दिवस वाढवावा, अशी मागणी विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
————-
भाजपला 120 ते 130 जागा मिळतील
जयंत पाटील यांचे भाकीत
भाजपने दोन मित्रपक्ष जोडले आहे. त्यांची चांगली चालती आहे, त्यामुळे जागा वाटपात भाजपला 120 ते 130 जागांवर समाधान मानावे लागेल असे चित्र आहे, तर उरलेल्या जागा ह्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला द्यावा लागतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी वर्तविले आहे.
————
जालना येथे मनोज जरांगेंची रॅली
छत्रपती संभाजीनगरात 13 जुलै रोजी
मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा महाएल्गार शांतता रॅली मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर येथे 13 जुलै रोजी होणार आहे. ही रॅली सिडको ते क्रांती चौक अशी साडेतीन किमी निघणार आहे. त्यामुळे जालना रोड शनिवारी सकाळी 11ते सायंकाळी 5 असे 7 तास बंद राहणार आहे.
——–
https://www.youtube.com/watch?v=QpWyCus4GtI&t=2s
लक्ष्मी ताठेंना गांजाच्या तस्करी प्ररकणी अटक
१९० किलो गांजा पकडल्याचा आरोप
राज्यात सध्या मद्यविक्री आणि अंमली पदार्थ विक्रीवरुन विरोधकांनी रान पेटवले असताना नाशिकमध्ये मोठी कारवाई झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी लक्ष्मी ताठे यांना ताब्यात घेतले आहे. तेलंगाणाच्या दामेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 जून 2024 रोजी 190 किलो गांजा पकडला होता. याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
—————–
माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा राजीनामा
राष्ट्रवादीत करणार प्रवेश
उदगीर मतदार संघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: भाजपाच्या कार्यालयाला भेट देऊन हा राजीनामा दिला आहे. या निर्णयानंतर आता ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भाजपाची साथ सोडताना त्यांनी यापुढे ही मित्रांना भेटण्यासाठी येत राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे
—————
चंद्रपुरातील 3 जागांसाठी ठाकरे गट आग्रही
शिवसेनेने विधानसभा लढवण्याची मागणी
चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विधानसभा जागांवर शिवसेना उबाठा गटाने दावा केला. वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारपूर या 3 जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला मिळाव्या या साठी पक्ष आग्रही आहे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांना सादर अहवाल केला. याच अहवालाच्या आधारावर 3 जागा शिवसेनेने लढविण्याची करण्यात मागणी आली. वरोरा ही शिवसेनेची पारंपरिक जागा असल्याने वरोरासाठी आग्रह केला. 2014 ला चंद्रपूरची जागा स्वबळावर लढल्यावर शिवसेनेने घेतली होती. काँग्रेस सलग 7 वेळा चंद्रपूर विधानसभेत पराभूत झाल्याने ही जागा शिवसेनेला देण्याची मागणी केली.
—————
मुख्यमंत्र्यांना ‘लाडकी बहीण’ तर, आम्ही कोण?
तृतीयपंथीयांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
राज्यातील लोकसभा निवडणुकांनंतर आता सर्व पक्षांनी आगामी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी सरकारनं उर्वरित अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारच्या वतीनं अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यापैकी एक योजना म्हणजे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. राज्यभरातील महिला या योजनेसाठी अर्ज करत आहेत. अशातच आता याच योजनेवरुन मुख्यमंत्र्यांना तृतीयपंथीयांनी प्रश्न विचारला आहे. मुख्यमंत्र्यांना ‘लाडकी बहीण’ तर आम्ही कोण? तृतीयपंथीयांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे.
————–
भारतानं जगाला बुद्ध दिला, युद्ध नव्हे
मोदींचा व्हिएन्नातील भारतीयांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आहेत. याआधी त्यांनी रशिया दौऱ्यादरम्यान व्लादीमीर पुतिन आणि इतर उच्चपदस्थांशी चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संबंध वृद्धिंगत करण्यासंदर्भात सहमती झाल्याचंही दिसून आलं. त्यानंतर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएन्नामध्ये असून तिथल्या भारतीयांशी त्यांनी बुधवारी संवाद साधला. यावेळी भारतानं जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध दिला, असं मोदी म्हणाले.
————–
अनंत-राधिकाच्या लग्नाला VVIP मंडळींची मांदियाळी
विविध राज्यांचे मुख्यमंत्री लावणार हजेरी
देशातील आघाडीचे उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानींच्या विवाह सोहळ्यात राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहेत. अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यातविविध पक्षांच्या नेत्यांसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिश्वास आदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध देशांचे राजनयिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
—————-
यूपी-बिहार, उत्तराखंडला मुसळधार पावसाचा फटका
कुठं रेल्वे रूळ हवेत तर कुठं भयानक भूस्खलन?
उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड या तीन राज्यांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढलं आहे. जोरदार होत असलेल्या पावसामुळे रेल्वे रूळ आणि पूल पाण्याखाली जाण्याचं सत्र कायम आहे. तर उत्तराखंडमध्ये भीषण भूस्खलनाची घटना घडली आहे. उत्तराखंडच्या चमोलीत भूस्खलन झाले. यामुळे जोशीमठ, बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आलाय. तर दुसरीकडे उत्तरप्रदेशातील काही रेल्वे रूळांचं हवेत रुपांतर झालंय. मुसळधार पावसामुळे पुलाखाली टाकलेला मातीचा भराव वाहून गेला. त्यामुळे नागरिक या रेल्वे रूळाचा पूल म्हणून वापर करताना दिसताय. अशा रुळामुळे रेल्वे वाहतूक धोकादायक असल्याने रेल्वे वाहतूकच बंद करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशातील लखीमपूर भागाला पावसाचा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले. शारदा नदीला आलेल्या पूरामुळे रेल्वे रूळच गायब झाला आहे. पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
चिखली येथील नोंदणी व मुद्रांक विभागात सुविधांचा अभाव!
पावसात होते नागरिकांची तारांबळ
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुकास्तरीय नोंदणी व मुद्रांक विभाग आणि दुय्यम निबंधक वर्ग २ यांच्या कार्यालयात रजिस्ट्री आणि अन्य व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या कार्यालयात नागरिकांना बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यात अचानक पाऊस आल्यास नागरिकांना भिजून त्रस्त व्हावे लागत आहे.
दिवसभरात कोट्यवधीचे व्यवहार करणाऱ्या या कार्यालयात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची, बसण्याची आणि ऊन-पाऊस यापासून बचाव करण्यासाठी छताचीही सुविधा उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याव्यतिरिक्त, नागरिकांकडून सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये छोट्या-मोठ्या त्रुटी काढून त्यांना परत पाठवण्यात येते आणि नंतर त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करून त्रुटी असताना देखील अनेकांची रजिस्ट्री करून देण्याचे काम या माध्यमातून छुप्या पद्धतीने होत असल्याचे सर्वश्रुत आहेत.याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने त्वरित या समस्यांचे निराकरण करावे आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.