जळगाव (Jalgaon) :- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात बुधवारी सायंकाळी परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या भयंकर अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एकूण 25 प्रवासी जखमी झाले आहेत . पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली आणि जीवाच्या भीतीने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या .मात्र त्याचवेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेत प्रवाशांच्या शरीराचे तुकडे झाले .अनेक जण जखमी झाले . अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मृत आणि जखमी प्रवाशांचे नातेवाईक मुंबईहून जळगावला पोहोचले आहेत . यात अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे .
पोलीस महसूल विभाग रेल्वे कर्मचारी आणि पाचोरा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांकडून रेल्वे अपघात घटनास्थळाची पाहणी करण्यात येत आहे . नेपाळमधील कुटुंबही घटनास्थळी अस्थि घेण्यासाठी दाखल झाले आहेत .दरम्यान 25 जखमींवर जळगाव आणि पाचोरा येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत . जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून पुष्पक एक्सप्रेस (Pushpak express accident) मधून उडी मारणारे अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे . त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो असं प्रशासनाने सांगितलं . 13 मृतांपैकी 7 मृतांची ओळख पटली आहे . यात नेपाळमधील 4 तर उत्तर प्रदेशमधील 3 जणांचा समावेश आहे .
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आतापर्यंत सात मृतांचा शवविच्छेदन झालं आहे .या सर्व मृतदेहांवर रासायनिक प्रक्रिया करून मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन केले जातील आणि त्यानंतरच नातेवाईकांना सुपूर्त करण्यात येतील . या मृतदेहांना पाच ते सहा दिवस त्यांच्या गावी जाण्यासाठी लागू शकतात त्यामुळे सर्व मृतदेहांवर रासायनिक प्रक्रिया करूनच मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात येतील असं डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी सांगितले आहे .
या अपघातात नेपाळमधील तसेच उत्तर प्रदेशमधील प्रवाशांचा समावेश असून त्या प्रवासांचे नातेवाईक जळगावत दाखल झाले आहेत .नेपाळमधील कमला भंडारी या पुष्पक एक्सप्रेसने मुंबईकडे जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली .त्यानंतर त्यांचा मुलगा तपेंद्र आणि सून दोघेही घटनास्थळी दाखल झाले होते .आपल्या आईची अस्थी आणि कपडे घेऊन भारत सरकारने मृतदेह नेपाळपर्यंत पोहोचवण्याची सुविधा करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.