बीड (Beed) :- राज्यातील रस्ते अपघाताचे (Accident) प्रमाण गेल्या काही वर्षात वाढल्याचे पाहायला मिळत असून केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली होती. वर्तमानपत्रात किंवा माध्यमांमध्ये सातत्याने अपघाताच्या बातम्या येत असून महामार्गावरच हे अपघात घडत असल्याचे दिसून येते. आता, बीड (Beed) जिल्ह्यातील पाटोद्याजवळ एका भीषण अपघातात वडिल आणि मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. दरम्यान, दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
बीडच्या पाटोदा शहराजवळ पुण्याहून केजकडे जाणारी भरधाव वेगातील कार पुलाच्या कठड्याला धडकून ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली. या अपघातात अश्फाक शेख (40 वर्षे) आणि त्यांचा मुलगा अल्ताफ शेख (15 वर्षे) हे दोघेही जागीच ठार झाले आहेत. पुण्यावरुन हे दोघेही आपल्या गावी म्हणजेच केजकडे येत होते. मात्र, पाटोदाजवळ आले असता त्यांच्या कारचा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती कार पुलाच्या कठड्याला धडकली. त्यानंतर तीन पलट्या खाऊन समोरून येणाऱ्या एका खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली. त्यात कारमधील दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कारमधून मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर, मृतदेह पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
सोलापूर-पुणे हायवेवरती हैदराबादकडून मुंबईकडे निघालेली लक्झरी बस अचानक पेटून जळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बेस्ट एक्सप्रेस नावाची लक्झरी बस नं .NL 01 B 1824 ही हैदराबादकडून मुंबईकडे जात असताना चालू वाहनाने अचानक पेट घेतला. यावेळी स्थानिक व पोलिसांनी सतर्कता दाखवत गाडीतील प्रवाशांना तातडीने खाली उतरवले आणि अग्निशमक बोलवून आग विझवण्यास सुरुवात केली. दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग विझली. मात्र, तोपर्यंत ही लक्झरी बस संपूर्णपणे जळून गेली होती. यात प्रवाशांचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले असले तरी गाडीच्या डीकीमधील बॅगा, मोबाईल, लॅपटॉप, आंबे, खाण्याचे साहित्य, मसाल्याचे वस्तू कपडे इत्यादी साहित्य पूर्णपणे जळून गेले आहे. ही बस हैदराबादची असून पोलीस या बसचा चालक अब्दुल इम्तियाज याच्याकडे चौकशी करीत आहेत.