निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का
मुंबई (Mumbai) :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्व राजकीय पक्ष जोरादार कामाला लागले आहेत. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्याप कोणीही उमेदवारांची यादी जाही केलेली नाही. तसेच जागावाटपावरुन ठाकगे गट आणि काँग्रेसमध्ये वाद देखील झाल्याची माहिती समोर येत होती. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्व काही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं.
आज ठाकरे गटाची पहिली उमेदावारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. वाशिमधील बंजारा समाजाचे पोहरदेवीचे महंत सुनील महाराज यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केला आहे. पक्षात वेळ आणि न्याय दिल्या जात नसल्याने सुनील महाराज यांनी एका पत्राद्वारे हे आपलं म्हणणं मांडलं आहे.ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा सगळ्यात मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
सुनील महाराज (Sunil Maharaj) यांनी आपल्या पत्रात उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले आहे की, शिवसेनेत कार्य करत असताना गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून त्यांनी भेटीची वेळ मागितली परंतु ठाकरेंकडून वेळ दिली गेली नाही. मी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही. या गोष्टीमुळे त्यांना असे वाटले की त्यांच्या योगदानाची आणि महत्त्वाची कोणतीही दखल घेतली जात नाही. या असंतोषामुळे त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
महंत सुनील महाराज यांनी आपल्या पत्रात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) त्यांच्या नेतृत्वाखालील कार्याचा गौरव केला, परंतु शिवसेनेतील त्यांच्या भूमिकेबद्दलची निराशा व्यक्त केली. त्यांनी नमूद केले की, शिवसेनेत काम करण्याचा त्यांचा हेतू निवडणूक तिकीट मिळवणे हा नव्हता तर पक्षाच्या हितासाठी कार्य करणे हा होता. मात्र, पक्षाने केलेल्या दुर्लक्षामुळे ते नाराज झाले.
याशिवाय महंत सुनील महाराज यांनी पक्षात नवीन कार्यकर्त्यांना प्रवेश मिळवून दिला होता. त्या कार्यक्रमासाठीही त्यांना निमंत्रण दिले गेले नाही. या सर्व घटनांमुळे ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी जड अंत:करणाने आपला राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
विशेषत: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटासाठी हे एक मोठे धक्कादायक पाऊल मानले जात आहे. बंजारा समाजात महंत सुनील महाराज यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांच्या या निर्णयाचा राजकीय परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.