बल्लारपूर,दुर्गापूर, लखमापूर येथे महाआरती
चंद्रपूर (Chandrapur) :- वाढदिवसाच्या दिवशी जगाच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छा मिळत आहे. लोकांचे प्रेम मिळत आहे. या प्रेमाने आपण भारावून गेल्याचे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथील बालाजी मंदिरात आयोजित महाआरती प्रसंगी ते बोलत होते.
मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले की, भगवान बालाजीची आपल्या परिवारावर कृपा आहे. महाराष्ट्रात कोणालाही मिळाला नसेल असा बहुमान भगवान बालाजीने आपल्या परिवाराला दिला आहे. आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू सरकारने माझ्या अर्धांगिनीची नियुक्ती तिरूपती बालाजी मंदिराच्या विश्वस्तपदी केली होती. यातून भगवान बालाजीची सेवा करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. केवळ मतदारसंघासाठीच नव्हे तर राज्याच्या हितासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. जनसेवेचे व्रत आपण घेतले आहे. हे व्रत अव्याहतपणे सुरू ठेवण्याचा आपण प्रयत्न करू, असेही मुनगंटीवार म्हणाले.