चंद्रपूर (Chandrapur) 6 जानेवारी :-
दररोज एकवीसशे रुपयांचा ऑक्सिजन आपण घेतो. ऐंशी वर्षांचे आयुष्य जगल्यास ६ कोटी १३ लक्ष २० हजार रुपयांचे ‘ऑक्सिजन’ आपण घेणार. विजेप्रमाणे मीटर लागले नाही. अन्यथा हा ‘ऑक्सिजन’ आपल्याला महागात पडला असता. त्यामुळे आयुष्यात आपण किमान २० हजार रुपयांची झाडे तरी लावायला हवी. झाडे लावण्याचा संकल्प हेच राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाचे उद्दिष्ट होय. त्यासाठी पर्यावरण रक्षणाचे कार्य स्वतःपासून सुरू करावे, असे आवाहन माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी येथे बोलताना केले.
मुल येथील मा. सां. कन्नमवार सभागृहात राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सदस्य सुयोग धस, ज्येष्ठ सिने अभिनेते जयराज नायर, कोकण विभागाचे ब्रँड अॅम्बेसिडर विकास महंते,भाजप महासचिव डॉ. मंगेश गुलवाडे, नंदकिशोर रणदिवे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. प्रीती तोटावर यांच्या ‘जंगलातील शिलेदार’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.
पर्यावरणाचे रक्षण आज आपल्यासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येकाने या कार्यासाठी योगदान द्यायला हवे, असेही ते म्हणाले. मी वन मंत्री असताना पर्यावरण रक्षण ही एक चळवळ व्हावी, यादृष्टीने प्रयत्न केले. यामुळे २ हजार ५५० स्क्वे. किमीने हरित आच्छादन वाढले. देशात पहिला क्रमांक आपल्याला प्राप्त झाला. चार ‘लिमका बुक रेकॉर्ड’ आणि दोन ‘गिनीज बूक ऑफ रेकॉर्ड’ मिळाले. ही जन आंदोलनाची चळवळ आपल्याला पुढे न्यावी लागेल, असे आवाहनही आ. मुनगंटीवार यांनी केले.