7 जानेवारीपर्यंत पुन्हा संपुर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट
महाराष्ट्र (Maharashtra) :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. थंडीचा जोर कमी झाला असून अरबी समुद्रात वाढलेल्या आर्द्रतेमुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे उत्तरेत धुके आणि थंडीची लाट निर्माण झाली आहे, काही भागांत बर्फवृष्टी होत आहे. परिणामी राज्यात कोरड्या थंड वा-याचे प्रवाह सक्रीय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या चोवीस तासांत विदर्भात पारा 4-5 अंशाने हळूहळू घसरणार आहे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 2-4 अंश सेल्सियसने तापमान घसरणार आहे. पुढील पाच दिवसात विदर्भात कमाल तापमानात फारसा परिणाम जाणवणार नाही. चार दिवसात राज्यात पुन्हा थंडी जाणवायला लागणार आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात येत्या चार ते पाच दिवसात 1-2 अंशांनी वाढ होणार असून किमान तापमान 2-4 अंश सेल्सियसने कमी होणार आहे. विदर्भात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. तर किमान तापमानात येत्या 24 तासांत 4-5 अंशांनी घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.