एनडीएला उत्तर प्रदेशमध्ये मोठा धक्का बसला आहे, एनडीएचे प्रमुख घटक पक्ष असलेले दोन पक्ष अपना दल आणि निषाद पार्टी यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी काळात उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय या दोन पक्षांनी घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल ने याबाबत आधी घोषणा केली, त्यानंतर निषाद पार्टीने देखील या संदर्भात घोषणा केली आहे. या दोन पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
एनडीएच्या (NDA) या दोन प्रमुख घटक पक्षांनी घेतलेला हा निर्णय भाजपसाठी चिंतेचं कारण बनला आहे, कारण घोषणा करेपर्यंत याबाबत भाजपला या संदर्भात कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे आता एनडीमध्ये सर्व आलबेल आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अपना दल एस आणि निषाद पार्टीचा हा निर्णय एनडीएसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जातं आहे.
यावर आता भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मित्र पक्षांनी एकतर्फी निर्णय घेतला आहे, आशा एकतर्फी निर्णयांवर भाजपच्या पातळीवर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाहीये, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो, मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही असं केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे.