आपण देव असल्याची भावना काही जणांना जाणवत आहे
डाॅ मोहन भागवत यांचा सल्ला
मी देव झालो, असे स्वत: म्हणू नये. तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या,’ अशा शब्दांत येथे आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी उपस्थितांचे ‘बौद्धिक’ घेतले. ‘क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखे कधी होऊ नये. चमकणे डोक्यात जाते. त्यामुळे वीज होऊन चमकण्यापेक्षा पणती होऊन तेवत, जळत राहावे,’ असा ‘सल्ला’ही त्यांनी दिला.बी पूर्व सीमा प्रतिष्ठानच्या वतीने संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक कै. शंकर दिनकर तथा भय्याजी काणे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात डाॅ. भागवत बोलत होते. प्रतिष्ठानचे सचिव जयवंत कोंडविलकर, रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव यांच्यासह बांधकाम विकासक नितीन न्याती या वेळी उपस्थित होते. संघाच्या विविध स्वयंसेवक आणि प्रचारकांनी केलेल्या देदीप्यमान कार्याचा गौरव करताना डाॅ. भागवत यांनी हा सल्ला दिला.
————
52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात
उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा
राज्यात येणारे उद्योग, प्रकल्प परराज्यात जात आहेत. नव्या उद्योगधंद्यांसाठी गुजरात तसेच इतर राज्यांना विशेष प्राधान्य दिले जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. तर सत्ताधारी महायुतीकडून राज्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झालेली आहे, असे सांगितले जाते. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आकडेवारी सादर केली आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. आम्ही अडीच वर्षात पाच वर्षांचे काम करून दाखवू, असे सांगितले होते. आता आम्ही सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आणून दाखविली आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.
———-
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसमोर विघ्नच विघ्न
मुंबई-गोवा महामार्गावर बेक्कार ट्रॅफिक जॅम
कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी मुंबईतील गणेशभक्त लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मंगळवारपासून मोठ्या संख्येने गणेश भक्त कोकणात जायला निघाले आहेत. तसेच कोकणासाठी एसटीच्या जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. तसेच खासगी वाहनांची संख्या देखील वाढल्याचे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे.
———-
रामदास कदम यांना मोठा झटका
घरातला माणूस विरोधात करणार काम
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांना घरातूनच आव्हान मिळणार आहे. खेड-दापोली हा भाग रामदास कदम यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण आता सख्खा-चुलत भाऊच रामदास कदम यांच्यासमोर उभा ठाकणार आहे. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात चुरशीचा राजकीय सामना पहायला मिळू शकतो. मागच्या काही वर्षांपासून खेड-दापोली मतदारसंघावर रामदास कदम यांच वर्चस्व आहे. सध्या त्यांचा मुलगा योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे. आता रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रचार करणार आहेत.
मनोज जरांगे अन् देवेंद्र फडणवीसांची फोनवरून चर्चा
त्या मुद्द्यावर चर्चेला उधाण
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फोनवरून जरांगे आणि फडणवीसांचं बोलणं करून दिलं. तेव्हा या दोघांमध्ये मराठवाड्यातील नुकसानीवर चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना आरक्षणावर चर्चा झाली नाही. शेतकरी चारी बाजूने संकटात सापडला, त्यांचे हाल होत आहेत. हा विषय महत्त्वाचा वाटला म्हणून त्या मुद्द्यावर चर्चा झालं, असं जरांगे म्हणाले.
————
राज्यपाल नियुक्त 12 जागांचं वाटप
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर
राज्यपाल नियुक्त 12 जागा मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रिक्त आहे. अशातच आता या 12 जागांवर नियुक्ती केली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. याचा फॉर्म्युला काय असणार आहे? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाष्य केलं आहे. आधी समसमान वाटप होणार होतं. 4- 4- 4 चा फॉर्मुला ठरला होता. मात्र आता भाजपाला 6 शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 असा फॉर्मुला ठरला असल्याची माहिती मिळते आहे, असं चंद्रकांत रघुवंशी म्हणालेत. चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते मला न्याय देतील, अशी मला अपेक्षा आहे, असं चंद्रकांत रघुवंशी म्हणालेत.
————
शरद पवार, उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणुक
चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात चांगल्याच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. ‘शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही’, अशी टॅगलाईन देत सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याची आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी टॅगलाईनच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत सौम्य भूमिका घेण्याचा आग्रह धरलाय, तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करु नये, असे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यासमवेत सुप्रिया सुळेंची बैठक पार पडली. या बैठकीत सुळेंनी पुढील रणनितीबाबत प्रवक्त्यांना मार्गदर्शन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
———–
कमला मिल टाइम्स टॉवरला भीषण आग
अशा घटना घडत असल्याचा मनसेचा आरोप
उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल टाइम्स टॉवरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे. मुंबईतील लोअर परळ पश्चिमेकडील टाइम्स टॉवर इमारतीला शुक्रवारी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सध्या आग विझवण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.