डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे अनावरण बुधवारी डोंबिवली जिमखान्यात करण्यात आले. यावेळी श्रीकांत शिंदे आगे बढो हम आपके साथ है ! अशा घोषणा महायुतीच्या नेते मंडळींनी केल्या.पूर्वेकडील डोंबिवली जिमखान्यात महायुतीची माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे, मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील, भाजपाचे नाना सूर्यवंशी, शशिकांत कांबळे, राहुल दामले, नंदकिशोर परब, मंदार हळबे, विकास म्हात्रे, शैलेश धात्रक, शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, संतोष चव्हाण यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपचे शशिकांत कांबळे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या मतदार संघातील विकास कामांची माहिती देत ते कार्यतत्पर कसे आहेत याची विस्तृत माहिती दिली. माजी खासदार आनंद परांजपे म्हणाले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची हॅटट्रिक नक्की होईल. तर भाजपा कल्याण जिल्हाअध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे विक्रमी मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामाची स्तुतीकरून त्यांना पुन्हा भरघोस मतांनी निवडून आणणार असे सांगितले.
यावेळी संकल्प पात्राची माहिती देताना खासदार, डॉ.श्रीकांत शिंदे म्हणाले, सर्व मतदारांचे धन्यवाद करतो कि मला दोन निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडणुन आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकाराच्या नेतृत्वाखाली विकास कामे केली. मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी सभा घेऊन मला विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिला. पंतप्रधान मोदी यांनी पत्र दिले आहे. हे पत्र माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, मला या पत्रातून मतदार संघात केलेल्या कामाबाबत कौतुकाची थाप दिली. मतदार संघात खासदार म्हणून पुढील पाच वर्षात विकास कामाचा संकल्प केला आहे. त्या संकल्प पत्राचे प्रकाशन करण्यात आले.
पुढील पाच वर्षात विकास कामाचा संकल्प केला आहे. या संकल्पपत्रातील कोणती विकास कामे करणार आहे त्यांची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. यामध्ये गेमचेंजर प्रकल्प, रस्ते, रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक, पार्किंग सुविधा, आरोग्य सुविधा, महिला दिव्यांग आणि दृष्टीहीनांचे सक्षमीकरण, केजी ते पीजी शिक्षणाची हमी, रोजगार संधी, भाषा-कला-नाट्य आणि संस्कृती, हक्काच्या घरांची हमी, दर्जेदार क्रिडा सुविधा, ग्रामविकास, धर्म-संस्कृती आणि इतिहास जतन, स्वच्छ-शुद्ध-मुबलक पाणी याबरोबर मूलभूत सुविधा कल्याण लोकसभा मतदार क्षेत्रातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा-मुंब्रा येथील सुमारे 22 लाख लोकांसाठी विकासाचा संकल्प आहे.