Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

शिवरायांची वाघनखे 19 जुलै रोजी साताऱ्यात ठेवणार | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

शिवरायांची वाघनखे 19 जुलै रोजी साताऱ्यात ठेवणार
सभागृहात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
 19 जुलैला छत्रपती शिवरायांची वाघनखे साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे अशी घोषणा मंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी विधानसभेत केली आहे.  या वाघनखासोबत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर सर्व शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवत आहोत. त्यासाठी केलेला हा एकत्रित खर्च आहे, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली. लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याबाबत दावे करण्यात आले. याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत एक निवेदन दिले. ही वाघनखे शिवरायांचीच असल्याचे आमच्याकडे आलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
———-
गडचिरोलीत दोन जहाल महिला नक्षल्यांचे आत्मसमर्पण
8 लाख रुपयांचे होते बक्षीस
गडचिरोली येथे आज, गुरुवारी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. प्रतिमाला सुखराम बोगा उर्फ मंजूबाई आणि अखिला संकेर पुडो उर्फरत्नमाला उर्फ आरती अशी या नक्षलवाद्यांची नावे आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर प्रत्यक्ष 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.. महाराष्ट्र शासनाने दोघींनाही आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षिस जाहिर केले आहे. शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे.
MVA विधानसभेच्या 225 जागा जिंकेल
शरद पवार यांचा विश्वास
महाविकास आघाडीने लोकसभेला महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. आता विधानसभेला तर महायुतीचा पार सुपडा साफ होईल, महाविकास आघाडीला विधानसभेत 288 पैकी 225 जागेवर यश मिळेल, असा विश्वास देखील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला.
———
वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गाचा प्रश्न ऐरणीवर
 वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
उमरेड चंपा मार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रस्ता ओलांडताना हा अपघात झाल्याने पुन्हा एकदा वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
———-
शिंदे-फडणवीस-पवार या त्रिमूर्तिला झटका
शरद पवारांची टीका
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. महायुतीचे पानीपत होईल याचा स्वप्नात सुद्धा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील बड्या नेत्यांनी विचार केला नव्हता. पण राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं टाकून शिंदे-फडणवीस-पवार या त्रिमूर्तिला झटका दिला. आता आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने विधानसभेत चमत्कार घडण्याचा दावा केला आहे. आघाडीतील नेत्यांमध्ये सत्तर हत्तींचं बळ आले आहे. विधासभेला महायुतीचा सुपडाच साफ होईल असा दावा शरद पवार करत आहेत.
———-
‘सगेसोयरे’चा अल्टिमेटम दोन दिवसात संपणार
जरांगे यांचा सरकारला इशारा
मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून पुन्हा सभा घेणं सुरू केलं आहे. सगेसोयऱ्यांवरून सरकारला दिलेली मुदत येत्या 13 तारखेला संपणार आहे. अशातच 13 तारखेपर्यंत निर्णय नाही घेतला तर मराठ्यांची बैठक बोलावणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर 13 तारखेनंतर बैठक घेऊन त्या बैठकीतून मोठा निर्णय घेण्यात येणार, असा इशाराच सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
———-
दिशा सालियन प्रकरणी नीतेश राणेंची चौकशी
आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ
बॉलीवूड इंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या चौकशीला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता आहे. कारण याप्रकरणी आता भाजप आमदार नीतेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. याप्रकरणी नीतेश यांना नोटीस देण्यात आलं आहे.  त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत  वाढ होण्याची शक्यता आहे.
——————–
 विदर्भात जोरदार तर मध्य महाराष्ट्र  हलका पाऊस
हवामान विभागाने दिला अंदाज
राज्यात मोसमी पावसाला पोषक हवामान आहे. किनारपट्टीवर अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उद्यापासून  (शुक्रवारी) पुढील तीन दिवस हवामान विभागाने किनारपट्टीसह पुणे, सातारा जिल्ह्यांना नारंगी इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  किनारपट्टीसह पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे.   उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील बाष्पयुक्त हवा वेगाने किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्याला पिवळा इशारा देण्यात आला असून, तिथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles