सांगली (Sangli) ४ ऑक्टोबर :- आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षणाची मर्यादा 50 वरून 75 टक्क्यांवर न्यावी. केंद्राने मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यास आमचा पाठिंबा असेल. त्यासाठी विधेयक आणल्यास आम्हीही केंद्राला पाठिंबा देऊ, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, आरक्षणाच्या बाबतीत असे आहे की 50 टक्क्यांच्यावर जाता येत नाही. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण जर हवं असेल तर संसदेत कायदेशीर दुरूस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आत्ता 50 टक्के आरक्षण आहे ते 75 टक्क्यांपर्यंत जाऊ दे. महाराष्ट्रात 75 टक्के का होऊ शकत नाही? म्हणजे आता 50 % आहे, 75% होण्यासाठी 25 ने वाढवावं लागेल. (Sharad Pawar) 25 % वाढवले की ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल, जिथं कमी आहे त्यांच्याबद्दलही विचार करता येईल. यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, संसदेत विधेयक आणावं. आम्ही त्यांना साथ देऊ, असंही पवार म्हणाले.
आरक्षण मिळावं अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात आहे. ते चुकीचे नाही. मात्र हे करत असताना इतरांना जे मिळतं त्याचंही रक्षण करणं, त्याला धक्का न बसणं याबद्दलही काळजी घेणं गरजेच आहे. मराठा आरक्षणासोबतच अन्य जे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत त्यांनाही आरक्षण मिळावे आणि ते देखील कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, अशी आपली भूमिका असल्याचं त्यांनी पुन्हा अधोरेखित केलं.