तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
चिखली (Chikhli) :- बुलढाणा जिल्ह्यातील जमिनीच्या फेरफारात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमितता उघड झाली आहे. महसूल खात्याच्या कार्यपद्धतीवर सातत्याने आरोप होत असताना, या प्रकरणाने तलाठी कार्यालयातील कामकाजाचा पर्दाफाश केला आहे.
प्रकरण असे की, चिखली तालुक्यातील एका जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात मयत व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. अर्जदाराने फसवणूक करत बोगस अर्ज दिला होता. संबंधित तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी जुनी कागदपत्रे न पाहता अर्जदाराच्या म्हणण्यानुसार नाव कमी केले. विशेष म्हणजे, फेरफाराची तारीख अर्जाच्या दुसऱ्याच दिवशी दिसली, आणि नोटीसही हितसंबंधित वारसांना न बजावता काही अज्ञात व्यक्तींना दिल्या गेल्या.
आमच्या प्रतिनिधीने केलेल्या तपासात असे आढळले की, 1988 मध्ये मयत झालेल्या व्यक्तीचे नाव डिसेंबर 2020 मध्ये काढण्यात आले. तलाठी चिखली यांनी हे करताना वारसांची नावे आधीच सातबारा उताऱ्यावर असल्याचे कारण दिले, मात्र प्रत्यक्ष सातबारा उताऱ्यावर ही नावे नोंदवली गेली नव्हती.
संपूर्ण प्रकरणात तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यातील संगणमत उघड झाले आहे. हिरवे कागद न आणल्यास काम न करण्याची पद्धत येथे रुढ आहे. माहीती अधिकारातील आदेशांचे पालन न करणे, आणि तहसीलदारांच्या आदेशानंतरही माहिती न देणे हे प्रकारही स्पष्ट झाले आहेत.
या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता असून, परिसरातील नागरिकांनी तलाठी, मंडल अधिकारी आणि अर्जदार यांच्या विरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली आहे.