मुंबई (Mumbai) :- अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे.
दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीच पोस्टमध्ये केला आहे. बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यांच्या हत्येमागे नेमंक कोण? असा प्रश्न महाराष्ट्रासह समस्त देशाला पडला होता. एसआरएच्या प्रकल्पाशी कथित वादामुळे त्यांची हत्या झाली असावी असा दावा काही जण करत होते. मात्र आता लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. हिंदी भाषेत मजकूर टाकून बिश्नोई गँगने ही हत्या आम्ही केली आहे असं बाबा सिद्दिकी यांचं नाव घेऊन सांगितलं आहे.
राजस्थानमध्ये ‘हम साथ-साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 1998 च्या काळवीट हत्येप्रकरणी सलमान खानच्या (Salman Khan) कथित सहभागामुळे बिश्नोईने यापूर्वी धमकी दिली होती आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. बिश्नोई समाजाने काळवीट पवित्र मानले आहे. म्हणून, लॉरेन्स बिश्नोईनेदावा केला की तो तेव्हापासून अभिनेत्यावर नाराज आहे. कोणत्याही टोळीप्रमाणे, बिश्नोई देखील बातम्यांमध्ये राहण्यासाठी आणि उच्च-प्रोफाइल लोकांना लक्ष्य करतात.