अमरावती, 23 मे, : जिल्हा परिषद अखत्यारीत येत असलेल्या सामान्य व पंचायत विभागाला ई-ऑफिसशी संलग्न करण्यात आले आहे. आता यामध्ये आणखी तीन विभागांची भर पडली आहे. लघुसिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा व कृषी या तीन विभागांना संलग्न केले जात आहे. हे तीनही विभाग आता डिजिटल होणार असून येथील सर्वच कारभार ऑनलाइन चालणार आहे. याचा आढावा सीईओ संतोष जोशी यांनी घेतला.
शासकीय व निमशासकीय सर्व कार्यालय हे डिजिटल करण्याचे शासनाचे आदेश आहे. याची अंमलबजावणी जिल्हा परिषदेत देखील सुरू करण्यात आली असून यापूर्वी प्राथमिकस्तरावर सामान्य प्रशासन आणि पंचायत विभाग ई-ऑफिसशी संलग्न करण्यात आले आहे. अशी सर्वच कार्यालय ऑनलाइन करण्याकरिता जिल्हा परिषदेत (In Zilla Parishad)प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशातच आता सुरुवातीला तीन कार्यालयदेखील ऑनलाइन केले जात आहे. एखादी फाईल अधिकाऱ्यांकडे ह मान्यतेकरिता पाठवायची असल्यास ती ई-ऑफिसद्वारे ऑनलाइनच पाठविली जाणार आहे.
त्यानंतर संबंधित अधिकारी ही फाईल ओपन करून यामध्ये रिमार्क देईल व ती पुढील टेबलवर ऑनलाइन पाठविली जाईल. एकंदरीत वेळेची आणि कागदाची बचत यामुळे होणार आहे. प्राथमिकस्तरावर दोन विभागांत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता कृषी, पाणीपुरवठा आणि लघुसिंचन विभले हे तीन विभाग ई-ऑफिसशी संलग्न होणार आहे. याचा बुधवारी सीईओ तथा मुख्य प्रशासक संतोष जोशी यांनी आढावा घेतला. लवकरच या तीन विभागांत ही प्रक्रिया सुरू करण्यात येण्याचा मानसदेखील त्यांनी व्यक्त केला.