नागपूर :- २७ जूनला ‘पारंब्या‘ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. नागपूर नगरीचे भूषण असलेले कविश्रेष्ठ नाटककार श्री. बळवंत लामकाणे यांच्या पारंब्या या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा कौटुंबिक वातावरणात पार पडला. लोकव्रत प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहात एकूण ८९ गेयस्वरूपाच्या कवितांचा समावेश आहे. या कविता संग्रहाला श्री. शिरीष कुलकर्णी, लोकव्रत प्रकाशन यांनी प्रस्तावना दिलेली आहे तर नागपूरातील ज्येष्ठ कवी श्री. अनिल शेंडे यांनी मनोगत मांडलेले आहे. साप्ताहिक जनमंगलच्या संपादक मंडळात असलेल्या ज्येष्ठ लेखिका डॉ. श्रीमती वृंदाताई जोगळेकर यांनी या कवितासंग्रहातील कवितांवर प्रकाशन सोहळ्यानिमित्त अतिशय समर्पक असे भाष्य केले. नागपूरतील प्रतिष्ठित मानले जाणारे श्री. किशोर धाराशिवकर उपाध्यक्ष, केशवनगर उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेज, कवी श्री. अनिल शेंडे व श्रीमती वृंदाताई जोगळेकर यांच्या हस्ते ‘पारंब्या’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गणेश वंदनाने करण्यात आली. मान्यवरांचे शाल, श्रीफळ व कवितासंग्रह देऊन स्वागत करण्यात आले. लोकव्रत प्रकाशन आणि सा. जनमंगलच्यावतीने कवी श्री. बळवंत लामकाणे यांचा पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ देऊन वृंदाताई जोगळेकर यांनी सत्कार केला. कवी श्री. अनिल शेंडे यांनी बळवंतरावांच्या एकूणच साहित्याचा व त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. आपल्या मनोगतात ते म्हणाले की, ५०हून अधिक एकांकिका, ४००हून अधिक गेय स्वरूपाची गाणी, नाट्यलेखन, कादंबरी, कथा, गझललेखन बळवंत लामकाणे यांनी केले. आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट अशा सर्वच ठिकाणी बळवंतरावंचे लेखन उत्तम व श्रेष्ठ आहे. कविता कृष्णमूर्ती, उत्तरा केळकर, रवींद्र साठे अशा अनेक नामवंत कलाकारांनी त्यांची गाणी गायलीत त्यांच्या अनेक नाटकांना लेखनाचे पारितोषिकही प्राप्त झाले. त्यांच्या नाटकांतून काम करणारे डॉ.गिरीश ओक, डॉ.विलास उजवणे असे व अन्य मातब्बर कलावंत त्यांनी घडविले. आज वयाचे ८५ वे वर्ष असतानादेखील त्यांचे लेखन सुरू आहे. असे गौरवोद्गारही त्यांनी काढले; मात्र विपुल साहित्य निर्मिती करूनही त्यांची दखल नाट्यक्षेत्र, सिनेक्षेत्र व काव्यजगताने घेतली नाही याची खंतही त्यांनी व्यक्त केली. नागपूरातील ज्येष्ठ लेखिका श्रीमती विजयाताई मारोतकर यांनी शाल, श्रीफळ व त्यांनी लिहिलेले पुस्तक देऊन श्री. बळवंतराव लामकाणे यांचा सत्कार याप्रसंगी केला. तसेच भारत विकास परिषदेच्या अध्यक्ष आसावरी वरकड यांनीही शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला व ‘पारंब्या’ या कविता संग्रहाचे प्रकाशन झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.साप्ताहिक जनमंगलच्या संपादक मंडळातील वृंदाताई जोगळेकर, असिस्टंट कमिशनर मोहिनी हेडाऊ, मानसशास्त्रज्ञ अदिती देशमुख, डॉ. स्वाती मोहरीर, प्रा.नीता खोत, क्षमा नायक या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. ज्येष्ठ लेखिका विजयाताई मारोतकर, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सभासद व नाट्य व सिने कलावंत श्री. नंदू शिंदे, श्री. संजय भाकरे हे ही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या सभापती व माजी नगरसेविका ॲड. मीनाक्षीताई तेलगोटे, काँग्रेस कमिटीच्या श्रीमती वृंदाताई विकास ठाकरे समुपदेशक डॉ. नितीन विघ्ने, लामकणे कुटुंबियातील सर्व सदस्य, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.