बंगळुरू (Bangalore) :-
यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाच्या सत्कारासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी चिन्नास्वामी स्टेडियमवर गर्दी केली होती. मात्र गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. यादरम्यान निर्माण झालेल्या चेंगराचेंगरीत आठ क्रिकेटप्रेमींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
कर्नाटक सरकारच्या वतीने आरसीबी संघाचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. संघाचे खेळाडू, राजकीय नेते आणि सेलिब्रिटी यांची उपस्थिती असल्याने हजारो चाहत्यांनी स्टेडियमकडे धाव घेतली. पण स्टेडियममध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक जमल्यामुळे परिस्थिती बिघडली.
पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, त्यात अनेक जण जखमी झाले आणि चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ही दुर्घटना घडल्यामुळे आरसीबी संघाचा सत्कार सोहळा तत्काळ स्थगित करण्यात आला असून, राज्य सरकारने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला जात आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.