सुगंधीं सुगंध तें। दरुगधीं दरुगध।।
गुणीं अवगुणीं मिळे।
ज्याचें त्यापरी निवळे।
त्या उदकाचा महिमा न कळे। उदकेंविण।।’
यातला लक्षात घ्यावा असा भाग म्हणजे रामदासांना निसर्गत: वाहते पाणी- म्हणजे नदी ही मायेसमान भासते. वाहत्या पाण्याचे रूप जसे कोणास कळत नाही, तसेच मायेचेही आहे. मायादेखील पाण्याप्रमाणे चंचल आहे. हा झाला एक विचार! पण या अशा विचाराशिवायदेखील रामदास नदीचे कोडकौतुक संधी मिळेल तेथे मोठय़ा प्रेमाने करतात. या नदीवर, वाहत्या पाण्यावर त्यांचे इतके प्रेम, की ‘दासबोध’ लिहिण्यासाठी त्यांनी जागा निवडली तीदेखील वाहत्या पाण्याचे सतत दर्शन देणारी.
‘गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनि चालली बळे
धबाबा लोटल्या धारा। धबाबा तोय आदळे।।’
हे त्यांचे वर्णन त्या शिवथर घळीचेच. तेव्हा त्यांना वाहते पाणी नेहमी खुणावत राहिले असे मानण्यास निश्चितच जागा आहे. या वाहत्या पाण्याभोवती उत्तम शेती फुलली, देवधर्म झाला आणि विविध संस्कृती उदयाला आल्या, याचे भान त्यांना असल्याचे दिसून येते. पाण्याची उपयुक्तता हा एक भाग. ती पाहताना रामदासांनी त्यामागील सौंदर्यगुणांकडे दुर्लक्ष केले असे झाले नाही.
‘नाना नद्या नाना देसीं। वाहात मिळाल्या सागरासी।
लाहानथोर पुण्यरासी। अगाध महिमे।
नद्या पर्वतींहून कोंसळल्या। नाना सांकडिमधें रिचवल्या।
धबाबां खळाळां चालिल्या। असंभाव्य।’
नदीचे वर्णन करताना ते असे हरखून जातात. ही वाहती नदी त्यांना केवळ पाहायलाच आवडते असे नाही. ती त्यांना सर्वागसुंदर भासते. त्या पाण्याचा खळखळ आवाज, त्या वाहण्यातून आसपास तयार होणारी आद्र्रता अशा सगळ्याचेच आकर्षण रामदासांच्या वाङ्मयातून ध्वनित होते.
‘भूमंडळीं धांवे नीर। नाना ध्वनी त्या सुंदर।
धबाबां धबाबां थोर। रिचवती धारा।।
ठाईं ठाईं डोहो तुंबती। विशाळ तळीं डबाबिती।
चबाबिती थबाबिती। कालवे पाट।।’
वाहते पाणी सुंदर असते, सुंदर भासते म्हणून ते केवळ वाहतच राहावे आणि समुद्राला जाऊन मिळावे असे त्यांना वाटत नाही. त्यांचे म्हणणे, हे पाणी पृथ्वीच्या गर्भापर्यंत जायला हवे. ‘वॉटर टेबल’ हा शब्दप्रयोग त्याकाळी जन्मास यावयाचा होता आणि कोणी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अशी मोहीमही हाती घेतली नव्हती. पण तरीही रामदासांना पाणी जमिनीत मुरवण्याचे महत्त्व माहीत होते. पाणी जमिनीत मुरले तरच ते साठून राहू शकते, असे रामदास सांगतात.
‘पृथ्वीतळीं पाणी भरलें। पृथ्वीमधें पाणी खेळे।
पृथ्वीवरी प्रगटलें। उदंड पाणी।।’
पृथ्वीच्या पोटात हे असे पाणी भरले की मगच ते लागेल तेव्हा वाहू शकते. त्याचे कालवे, पाट काढता येऊ शकतात. हे सर्व रामदासांना सांगावयाचे आहे. वरवर पाहता हा संदेश तसाच दिला गेला असता तर कोरडा ठरला असता. परंतु रामदास किती काव्यात्मतेने तो देतात, ते पाहा :
‘भूमीगर्भी डोहो भरलें। कोण्ही देखिले ना ऐकिले।
ठाईं ठाईं झोवीरे जाले। विदुल्यतांचे।।
ऐसें उदक विस्तारलें। मुळापासून सेवटा आलें।
मधेहि ठाईं ठाईं उमटलें। ठाईं ठाईं गुप्त।।’
झोवीरे म्हणजे झरे. खळाळत वाहणाऱ्या झऱ्यांना रामदास आकाशातल्या विजेची उपमा देतात. पाण्याला आपण ‘जीवन’ म्हणतोच. रामदास पुढे जाऊन सांगतात- झाडेझुडपे, वृक्षवेली आदींना जे काही गुणधर्म प्राप्त झाले आहेत, तेदेखील पाण्यामुळे.
‘नाना वल्लीमधें जीवन। नाना फळीं फुलीं जीवन।
नाना कंदीं मुळीं जीवन। गुणकारकें।।
नाना यक्षुदंडाचे रस। नाना फळांचे नाना रस।
नाना प्रकारीचे गोरस। मद पारा गुळत्र।।’
तात्पर्य ‘उसात गोडवा निर्माण झाला आहे तोदेखील पाण्यामुळे!’ हे रामदास नमूद करून जातात.महाराष्ट्राने या गोडव्याच्या लोभाने पाण्याचा किती भ्रष्टाचार केला, हे तर विदित आहेच. सांप्रति महाराष्ट्रात जी दुष्काळी स्थिती आहे तीदेखील या जलव्यवस्थापनाच्या अभावानेच. जवळपास ४०० वर्षांपूर्वी समर्थ रामदास हा नि:संग कवी पाण्याचे महत्त्व सांगतो; आणि आजच्या सुशिक्षित महाराष्ट्राला ते जाणवू नये, हीच या राज्याची शोकांतिका नव्हे काय? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे रामदासांचा हा श्लोक-
‘उदक तारक उदक मारक । उदक नाना सौख्यदायक।
पाहातां उदकाचा विवेक। अलोलीक आहे।।’
हा उदकाचा विवेक महाराष्ट्रात पुन्हा दिसणार काय?