माथी भडकवून राजकारण करण्याचे प्रयत्न
महाराष्ट्रात (Maharashtra) सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे मुळातच महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाहीये असे भाष्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच भाजपला पाठिंबा लोकसभे पुरताच दिला असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याच दरम्यान त्यांनी आरक्षणाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. तसेच बाहेरच्या राज्यातील मुलं येतात आणि आपल्या राज्यातील नोकऱ्या बळकवतात असंही त्यांनी म्हटलं आहे. “महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मला असं वाटतं की यामध्ये जात येते कुठे? महाराष्ट्रातील आपल्या मुला-मुलींना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे. महाराष्ट्र हे राज्य असं आहे की देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून आपण बघतो.”
पुढे बोलताना राज ठाकरे यांनी आरक्षणासह (Maratha Reservation) राज्यातील जातीपातीच्या राजकारणावरही भाष्य केलं. महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळाली पाहिजे, यात जात येते कुठे? महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होतात. खासगी शिक्षण संस्था आणि नोकऱ्यात आरक्षण नाही. मग किती जागांवर आरक्षण आहे? हे बघणंही गरजेचं आहे. मुळात सध्या माथी भडकवून राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. हे फक्त मतांचं राजकारण आहे. प्रत्येकाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. यातून हाताला काहीही लागणार नाही, असे ते म्हणाले.