नागपूर (Nagpur) : – सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी नागपूरच्या सुरेश भट सभागृहात पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले. मात्र, या सोहळ्यावर वारेमाप खर्च झाल्याने विभागातील अधिकारी आणि कर्मचारी चक्रावले आहेत.
भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबरला ‘अभियंता दिन’ म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विभागाचे मंत्री उपस्थित होते, तसेच ३५ अभियंते व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पण कार्यक्रमावर झालेला खर्च हा चर्चेचा विषय ठरला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कार्यक्रमासाठी अंदाजे ५० ते ७५ लाख रुपयांचा खर्च झाला असल्याचे बोलले जाते. विशेषतः पाण्याच्या बाटल्यांवरील खर्चाचा आकडा पाहून अधिकारीही धास्तावले आहेत. एका व्यक्तीने एका दिवसात २१ लिटर पाणी प्यायल्याचा हिशोब दाखवला गेला, जो पूर्णतः अविश्वसनीय वाटतो. शिवाय, जेवणावरील खर्चही वाजवी होता, असे काहींनी नमूद केले.
या प्रकारामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिनस्थांना जाब विचारला असून, खर्चाचे जस्टिफिकेशन मागितले आहे. सोहळ्यातील खर्चावर संशय व्यक्त करत खुल्या चौकशीची मागणी केली जात आहे. विभागातील आर्थिक नियोजन आणि पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
यामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार असल्याचा संशय असून, वरिष्ठांनी यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.