नाशिक, २६ मे, : मागील वर्षी अत्यल्प पडलेला पाऊस यामुळे नांदगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अभूतपूर्व अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यासह शेती व्यवसाय व आता त्याला जोडधंदा म्हणून कार्यरत असलेला पोल्ट्रीफार्मचा व्यवसाय देखील धोक्यात आला असून नाशिक जिल्ह्यात 1 हजार 862 पोल्ट्रीफार्म यापैकी जवळपास 60 टक्के पोल्ट्रीफार्म बंद पडले आहेत. पाणी टँचाई उष्माघात यामुळे पक्षी मरून जातात. परिणामी आमचे मोठया प्रमाणावर नुकसान होते आहे. यामुळे आम्ही गेल्या पाच महिन्यापासून पोल्ट्रीफार्म बंद ठेवले असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. तर जवळपास माल उपलब्ध नसल्याने चिकन मिळत नाही. लांबून माल आणला तर भाववाढ करावी लागते, परिणामी धंदा कमी होत आहे, असे चिकन व्यवसायिक सांगत आहेत.
पावसाअभावी निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणी टंचाई आणि वाढत्या तापमानाचा फटका इतर घटका प्रमाणे पोल्ट्रीफार्म(Poultry farm)व्यवसायला देखील बसला असून मनमाड,मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे 60 टक्के पोल्ट्रीफार्म बंद झाले असल्यामुळे पोल्ट्री फार्म व्यवसाय धोक्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास 1800 पेक्षा जास्त पोल्ट्रीफार्म आहेत यापैकी 60 बंद पडले आहेत. भविष्यात पाऊस आला नाही तर मोठ्या प्रमाणावर अजून पोल्ट्रीफार्म बंद पडतील. मुळात आम्ही शेतीला पूरक व्यवसाय म्हणुन पोल्ट्रीफार्म व्यवसाय करतो. मात्र, याला आम्हाला कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही. याशिवाय इतर राज्याप्रमाणे कर माफी देखील नाही. मुळात आम्ही कर्ज काढून हा व्यवसाय केला आहे आणि आता जानेवारी पासुन पाण्याअभावी 60 टक्के शेड बंद आहेत. यामुळे यावर्षी कर्ज भरण शक्य नाही. पोल्ट्रीफार्म व्यवसायबाबत राज्य सरकारने काही तरी धोरण केले पाहिजे असे मत शेतकरी व पोल्ट्रीफार्म व्यवसायिकानी व्यक्त केले आहे.
तर, सध्या नाशिकच्या अनेक भागात चिकन माल उपलब्ध नाही. यामुळे लांबून माल अणूंन विकावा लागत आहे. पूर्वी 180 ते 200 रुपये किलो होते. आता 240 ते 260 रुपये किलो भाव झाला आहे. भाववाढ झाल्याने आमच्या व्यवसायवर परिणाम झाल्याचे मत चिकन विक्रेते यांनी व्यक्त केले. तर, सर्व गोष्टींच्या भावात वाढ झाली आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तू कितीही महाग झाल्या तरी जगण्यासाठी त्या खाव्या लागतात. यामुळे आता किलोच्या ऐवजी अर्धा किलो घेतो, असे मत ग्राहकांनी व्यक्त केले आहे.