Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

एकमेकांवरील चिखलफेक मतदानापर्यंतच !

एकमेकांवरील चिखलफेक मतदानापर्यंतच !

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आपले जास्तीत जास्त आमदार निवडून यावे यासाठी सर्व पक्षातील राष्ट्रीय नेते ते स्थानिक नेते प्रचाराला सरसावले आहेत. मात्र या रणधुमाळीत एकमेकांवर चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप आणि टीका टिप्पण्या सुरु आहे. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांना डिवचण्यातच  धन्यता मानत आहेत. प्रचाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर चकलफेक केली जात आहे. आणि हा सर्व खटाटोप सुरु राहणार मतदानाच्या दिवसापर्यंत. एकदा का निकाल हाती आला की हेच नेते एकमेकांना शुभेच्छा देतील याचे आश्चर्य वाटून घेऊ  नये.

सध्या विधानसभा प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आकाशात नेत्यांच्या खासगी विमानांची आणि हेलिकॉप्टर्सची वर्दळ वाढली आहे. सर्व प्रमुख नेते प्रचारकार्यात व्यस्त झाले आहे. गावोगावी, शहरा-शहरांमध्ये प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. या प्रचारसभांमध्ये नेत्यांच्या भाषणात एक बाब प्रखरपणे जाणवते ती म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांवर होणारी चिखलफेक. मग समोरचा नेता पंतप्रधान असो, लोकसभेचा विरोधी पक्षनेता असो अथवा राज्यातील प्रमुख नेता. चिखलफेक ही ठरलेली. मग ही चिखलफेक आरोप किंवा टीकेच्या माध्यमातून केली जात आहे. विशेषकरून काँग्रेस आणि भाजपमध्ये हा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या मुद्द्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी असो, सोनिया गांधी असो की स्वर्गीय इंदिरा गांधी असो, टीका आणि आरोप करताना दिसत आहेत. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना लोकशाहीचा गळा दाबला. संविधानाचा अनादर करत आणीबाणी लावली. आणि त्याच काँग्रेसचे नेते आज संविधान रक्षणाचे बाता करत आहे, असा आरोप जवळपास सर्वच सभांमध्ये करताना दिसत आहेत. तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसला डिवचने सुरू केले आहे. तीन-चार दिवसांपूर्वी योगींच्या महाराष्ट्रात सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी ‘बटेंगे तो काटेंगे’चा नारा देत काँग्रेसवर आरोप केला.  समाजा समाजामध्ये विष कालवण्याचे काम काँग्रेस करत आहेत. काँग्रेसच्या काळात पाकिस्तानातील अतिरेक्यांनी देशात घुसून अराजकता माजवली होती. चीनकडून घुसखोरी केली जायची. संबंध खराब होण्याची चिंता असलेल्या काँग्रेसने त्यावर कायम माैन बाळगले. देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हापासून काँग्रेसने सत्ता उपभोगत असताना केवळ स्वहित जोपासण्यात धन्यता मानली. धर्म आणि देश, राष्ट्रीय एकात्मता, समाज, मूल्य आणि आदर्शांची चिंता न करता केवळ देशाला तोडण्याचे काम केले. जातीपातीचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसपासून पासून जनतेने सावध राहावे, तसेच समस्त हिंदू बांधवांनी विस्कळीत न होता एकसंघ राहायला हवे. अन्यथा हिंदूंची दैना झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी केले. शिवाय ‘बटेंगे तो कटेंगे’ असे म्हणण्यासही ते विसरले नाहीत. आता हाच नारा भाजपच्या प्रचाराचे मुख्य स्लोगन झाले आहे.

 

दुसरीकडे काँग्रेस नेतेही योगींच्या या स्लोगनवर प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. भाजपकडून वातावरणनिर्मितीसाठी ‘बटेंगे तो कटेंगे’ या नाऱ्याचा वापर केला जात असतानाच काँग्रेसच्या वतीने ‘जुडेंगे तो जितेंगे’ने प्रत्युत्तर दिले जाईल, असे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. योगी आदित्यनाथ यांचा ‘बटेंग तो कटेंग’ चा नारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवडला आहे. आता भाजपच्या लोकांमध्ये ही घोषणा देण्याची स्पर्धा लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ अशी नवी घोषणा दिली आहे. निवडणुकीत नेमकी कोणाची घोषणा चालणार हे आधी भाजपने ठरवावे. मोदी व योगी यांनी एकत्र बसून नेमका कोणता नारा द्यायचा ते आधी ठरवावे. मारनेवाले, बांटनवाले तुम्हीच आणि दुसऱ्यांना बटेंगे तो कटेंगे सांगतात. देशाच्या एकतेसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले. भाजपच्या कोणत्या नेत्याने बलिदान दिले ते सांगा? मोदी हे खोटं बोल पण रेटून बोल ही मोदींची नीती आहे. आता त्यांचे अनुसरण दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेतेही करत आहे. नरेंद्र मोदी हे खोट्यांचे सरदार आहेत, अशी टीकाही खर्गे यांनी केली आहे. दरम्यान, हे आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक मतदानापर्यंत सुरूच राहणार यात कुठलीही शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles