पीएम’ उद्या वर्ध्यात
शहरात सुरक्षा व्यवस्था तैनात
केंद्र शासनाच्या पी. एम. विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २० सप्टेंबरला स्वावलंबी मैदानात होणार आहे. त्याकरिता शहरात तगड़ी सुरक्षा व्यवस्था राहणार असून, शहरातील वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. तसेच वाहनतळांचीही निश्चिती करण्यात आली आहे, याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी केले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे २० सप्टेंबर रोजी सकाळी ६:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत वाहतूक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अचाधित राहावी, म्हणून सभास्थळाकडे जाणारा रहदारीचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तसेच पार्किंगस्थळाकडे जाणारा मार्ग कार्यक्रमाकरिता येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनांकरिता रहदारी मार्गात बदल करण्यात आला आहे. जड वाहनांना शहरामध्ये प्रवेशबंदी केली आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने व अतिमहत्वाच्या सेवा देणाऱ्या वाहनांना यामधून सूट देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.
———
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ
पहिल्या टप्प्यातील मतदानात इतिहास रचला
श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आम्ही देशाच्या संसदेत म्हटले आहे की आम्ही जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देऊ. हे भाजपच पूर्ण करेल. त्यामुळे 25 सप्टेंबर रोजी मतदानाचे सर्व विक्रम मोडीत काढावेत, असे माझे आवाहन आहे. याआधी नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेसबद्दल ते म्हणाले, ‘या तिन्ही कुटुंबांनी आपले राजकीय दुकान चालवण्यासाठी अनेक दशकांपासून खोऱ्यात द्वेषाचा माल विकला आहे. यामुळे येथील तरुणांची प्रगती होऊ शकली नाही. गेल्या 6 दिवसात पंतप्रधान मोदींचा हा दुसरा काश्मीर दौरा आहे. यापूर्वी ते 14 सप्टेंबरला डोडा येथे पोहोचले होते. येथे ते पक्षाच्या उमेदवारांचीही भेट घेणार आहेत. यानंतर ते दुपारी 3 वाजता कटरा येथे जातील, तेथे दुसरी जाहीर सभा होणार आहे.
————
अजित पवार पक्षाचे नेते नाराज
थेट दिल्लीत भाजपा नेत्यांची तक्रार
अजित पवार पक्षाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे थेट दिल्लीतील नेत्यांसोबत याबाबत बोलणार असल्याचं समजत आहे. वादग्रस्त तसंच धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणा-या भाजपा नेत्यांची तक्रार अजित पवार पक्षाचे नेते दिल्लीत करणार आहेत. नितेश राणेंसह काही नेते मुद्दाम मुस्लिम धर्माविषयी वाद निर्णाण होणारी वक्तव्य वारंवार करतात यावरून अजित पवार गटाचे नेते नाराज आहेत. पत्रकार परिषद तसंच भाषणांच्या माध्यमातून भाजपा नेते करत असलेल्या वक्तव्याविरोधात अजित पवार यांच्या पक्षात नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
————-
महाराष्ट्रात महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित
288 पैकी 155 ते 160 जागा लढणार
राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती पुढे आलीय. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (महायुती) 80 टक्के जागावाटप निश्चात झाले आहे. उर्वरित जागांबाबत 3 ऑक्टोबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशातील जम्मू-काश्मीर, हरियाणासोबतच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, निवडणूक आयोगाने इतर राज्यांच्या निवडणुका जाहीर करताना त्यातून महाराष्ट्राला वगळले. त्यामुळे राज्यात नेमकी निवडणूक कधी..? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. निवडणूक आयोगातील सूत्रांनी आता याबाबत माहिती दिलीय. महाराष्ट्राच्या वर्तमान विधानसभेचा कार्यकाळ आगामी 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे राज्यात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले
————-
नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी
ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. या माजी नगरसेवकाने सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
————
विधानसभा निवडणूक 10 ते 20 नोव्हेंबरदरम्यान
भाजप 160 जागा लढणार
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 160 जागा लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ABP माझाला दिली आहे. भाजप गेल्यावेळी लढल्या तेवढ्याच जागा यंदाही लढणार असून त्यासाठी कंबर देखील कसल्याची माहिती मिळत आहे. कार्यकर्त्यांना लवकरात लवकर कामाला लागण्याच्या सूचना देखील पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आल्याची माहिती देखील भाजपमधील सर्वाधिक विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुका 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान, होण्याची शक्यता असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे.
———–
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा
कारण अद्याप गुलदस्त्यात
बिहारचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. या पोस्टमध्ये शिवदीप लांडे यांनी म्हटले आहे की, माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या या सगळ्या कार्यकाळात मी बिहार राज्याला स्वत:पेक्षा आणि कुटुंबापेक्षा सर्वोच्च मानले आहे. माझ्या सेवेच्या काळात माझ्याकडून कोणतीची चुकभूल झाली असेल तर मी त्यासाठी क्षमस्व आहे. मी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. मात्र, मी बिहारमध्येच राहणार आहे. यापुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल, असे शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.
———–
20, 21, 22, 23 सप्टेंबर
चार दिवस बँका राहणार बंद
सप्टेंबर महिन्यात अनेक सण आहेत. नुकतेच गौरी-गणपती हे सण मोठ्या उत्साहात पार पडले आहेत. आगामी काळात सप्टेंबर महिन्यात आणखी सण आहेत. याच कारणामुळे सप्टेंबर महिन्यात देशात वेगवेगळ्या ठिकाणी बँका साधारण 15 दिवस बंद असणार आहेत 20 ते 23 सप्टेंबर अशा एकूण चार दिवस बँका बद असतील. शुक्रवारी म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद-उल-नबी असेल. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि श्रीनगर येथील सर्व बँका बंद असतील. त्यानंतर शनिवारी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी श्री नारायण गुरु समाधि दिवस आहे. त्यामुळे या दिवशी केरळमधील सर्व शासकीय आणि खासगी बँका बंद असतील. सोमवारी म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी महाराजा हरी सिंह यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे जम्मू आणि श्रीनगर येथील बँका बंद असतील. महाराष्ट्रात मात्र 20, 21 आणि 23 सप्टेंबर रोजी बँका चालू राहतील.