नवी दिल्ली, 11 डिसेंबर : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात आविश्वास प्रस्ताव आणल्यावरून संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच उपराष्ट्रपतींच्या विरोधातील अजेंडा यशस्वी होऊ देणार नसल्याचे त्यांनी बजावले. दरम्यान जॉर्ज सोरोस आणि सोनिया गांधीं संदर्भात त्यांनी आरोप केल्यामुळे विरोधकांनी सभागृहात एकच गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
रिजिजू यांनी विरोधकांना कोंडीत पकडले आणि म्हणाले, “भारतीय लोकशाहीत 72 वर्षांनंतर एका शेतकऱ्याच्या मुलाने उपराष्ट्रपती पदापर्यंत पोहोचून देशाची सेवा केली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने उपराष्ट्रपतींनी कशी सेवा केली याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. विरोधकांना लोकशाहीचा आदर नाही आणि ते सभापतींच्या प्रतिष्ठेची काळजी देखील ठेवत नसल्याचे दिसून आलेय. विरोधक लोकांसमोर निरर्थक आरोप करतात, तुम्ही या सभागृहाचे सदस्य होण्याच्या लायकीचे नाही अशा शब्दात रिजिजू यांनी आपली नाराजी व्यक्त केले. यासोबतच रिजिजू म्हणाले की, आम्ही सर्वजण या देशाची स्वायत्तता आणि एकात्मता जपण्याची शपथ घेऊन आलो आहोत. जर तुम्ही उपराष्ट्रपती पद आणि उपराष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेवर हल्ला केला, तर आम्ही त्यांचा पूर्ण बचाव करू. आणि आम्ही तुमचे हेतू सफल होऊ देणार नसल्याचे रिजिजू यांनी सांगितले. काँग्रेस-सोरोस यांच्या कथित संबंधाचा मुद्दा उपस्थित करत ते म्हणाले, “सोनिया गांधी आणि सोरोस यांच्यातील जो दुरावा आज समोर येत आहे, तो दुवा आम्ही बनवला नाही. हा अहवाल आमचा नाही. हा अहवाल आंतरराष्ट्रीय जगतात, भारताच्या विरोधात काम करणाऱ्या काँग्रेस आणि सोरोस यांच्यातील संबंधाची तुम्हाला जगभर लाज वाटली पाहिजे अशी टीका रिजिजू यांनी यावेळी केली. या सभागृहातील सर्व सदस्यांनी मिळून भारताच्या नावावर एकता दाखवली पाहिजे. पण तुम्ही भारतविरोधी लोकांच्या पाठीशी उभे राहता. भारताचे नुकसान करणाऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहता आणि नंतर अध्यक्षांच्या विरोधात नोटीस देता. असा अध्यक्ष मिळणे कठीण आहे. तुम्ही जर सभापतींच्या विरोधात बोलाल किंवा अशा प्रकारे नोटीस बजावली तर आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही असे रिजिजू यांनी ठणकावले.