पहलगाम (Pahalgam) हल्ल्याची तुलना ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी होऊ लागल्यानंतर आता पाकिस्तानविरोधात एखादी लष्करी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढू लागल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. दिल्लीतील नॉर्थ व साऊथ ब्लॉकमध्ये दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सूत्रधारांना धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी दिवसभर बैठकांचा सपाटा लावला. तर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील जाहीर भाषणातून जगभरातील दहशतवाद्यांना सूचक इशारा दिला. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणारे आणि त्यासाठी षडयंत्र रचणाऱ्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा करणार असल्याचं मोदी म्हणाले.
पहलगाम मध्ये हल्ला करणारे ७ दहशतवादी होते, त्यापैकी ४ ते ५ जण पाकिस्तानातील होते. त्यांच्या उर्दूच्या लहेजानुसार ते पाकिस्तानातील असल्याचं स्पष्ट झालंय, कारण ती भाषा पाकिस्तानातील एका विशिष्ट भागात बोलली जाते. तर पीर पांजर रेंजमध्ये हे दहशतवादी पळून गेले आहेत.
तर, भारताने आजपासून पाकिस्तानी नागरिकांनी देण्यात येणारी व्हिसा सेवा बंद केली आहे. सध्यस्थितीतील वैध व्हिसा २७ एप्रिलपर्यंत वैध राहतील, तर वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध राहणार आहेत. व्हिसा अवैध ठरण्याआधीच पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरूवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन संशयित आरोपींचे रेखाचित्र जाहीर केले. तीनपैकी दोन अतिरेकी हे पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अतिरेक्यांची खात्रीशीर माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.