नागपूर (Nagpur) :- टिपेश्वर अभयारण्यातून आतापर्यंत अनेक वाघांनी स्थलांतर केले. केवळ स्थलांतरच नाही तर लांब अंतराच्या स्थलांतरणामुळे त्याचे ‘रेकॉर्ड’ देखील नोंदवले गेले. याच अभयारण्यात काहीही दोष नसताना १४ माणसाच्या मृत्यूचा ठपका ठेवून ‘अवनी’ या वाघिणीला ठार करण्यात आले. आता याच अभयारण्याने आणखी एक नवी नोंद केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात पहिल्यांदाच रानगव्याची वैज्ञानिक नोंद करण्यात आली. अलीकडच्या काही वर्षात या व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढली. त्यानंतर आता पहिल्यांदाच रानगव्याची नोंद या अभयारण्यात करण्यात आली. नागपुरपासून सुमारे १८० किलोमीटर अंतरावरील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे.
टिपेश्वरला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला, त्यावेळी वाघांची संख्या थोडीथोडकीच होती. मात्र, उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे या अभयारण्यात अलीकडच्या काही वर्षात वाघांची संख्या चांगलीच वाढली. तुलनेने अधिवास कमी पडत असल्याने वाघ येथून स्थलांतर करत असल्याचे देखील समोर आले आहे. आता रानगव्याच्या नोंदीने पुन्हा एकदा हे अभयारण्य चर्चेत आले आहे. टिपेश्वरमध्ये वैज्ञानिकरित्या पहिल्यांदाच रानगव्याची नोंद करण्यात आली. यापूर्वी १९८५ मध्ये व त्यानंतर २००२-०३ मध्ये रानगवा दिसल्याची चर्चा होती.