जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (Operation Sindoor) नऊ ठिकाणच्या दहशतवादी तळांवर कारवाई करत दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत केलं. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्यालाही भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली. तसेच पाकिस्तानने आगळीक केल्यास जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा इशारा आता भारताने दिलेला आहे.
या सर्व घडामोडींवर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करत पाकिस्तानला कडक इशारा दिला. भारत आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही, पाकिस्तानची तयारी सीमेवर वार करण्याची होती, पण भारताने पाकिस्तानच्या छातीवरच वार केला, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्याबरोबर व्यापाराबाबात झालेल्या चर्चेनंतर शस्त्रविरामावर सहमती झाली असे म्हटले होते. हा दावा परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला आहे. तसेच स्पष्ट केले की दोन्ही देशांमधील शस्त्रविरामाचा निर्णय हा सैन्याच्या कारवाईनंतर घेण्यात आला. जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवावा, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.