नीट-यूजी निकालातील 0.001 टक्के त्रुटीचेही निवरण व्हावे
नवी दिल्ली18 जून:- नीट-यूजी 2024 परीक्षेतील अनियमिततेच्या तक्रारीवर आज, मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. जर एखाद्याकडून 0.001 टक्के निष्काळजीपणा असेल तर त्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त करत नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) आणि केंद्र सरकारला नोटीस बाजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 8 जुलै रोजी होणार आहे.
याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) अनेक प्रश्न विचारले. नीट परीक्षेत 0.001 टक्के निष्काळजीपणा असला तरी त्यावर कारवाई करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. यासह सर्वोच्च न्यायालयाने एनटीए आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आणि या प्रकरणी उत्तर दाखल करण्यास सांगितले. या वैद्यकीय चाचणीसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल बोलताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, या याचिकेकडे विरोधी नजरेने पाहिले जाऊ नये.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने सांगितले की, या परीक्षांच्या तयारीसाठी मुलांच्या मेहनतीची आम्हाला जाणीव आहे. समजा या यंत्रणेची फसवणूक करून एखादी व्यक्ती डॉक्टर झाली. अशी व्यक्ती समाजासाठी घातक असते. परीक्षा देणाऱ्या एजन्सीचे प्रतिनिधित्व करताना तुम्हाला खंबीरपणे उभे राहावे लागेल, असे खंडपीठाने म्हटले आहे. काही चूक झाली असेल तर ती मान्य करून काय कारवाई केली जात आहे हे स्पष्ट केले पाहिजे. यामुळे तुमच्या कामगिरीवर आत्मविश्वास निर्माण होतो असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 8 जुलै रोजी होणार आहे.