नागपूर (Nagpur) 3 Sep :- रसाळ संत्री आणि तरी पोहा यापेक्षा वेगळी नागपूरची ओळख सांगायची झाल्यास देशातील मार्बत मिरवणारे एकमेव शहर म्हणजे नागपूर. राज्यविकास पर्यटन मंडळाने मान्यता दिलेल्या नागपूर शहराने वर्षानुवर्षे मार्बत मिरवण्याची परंपरा जपली आहे. आणि त्यामुळे संपूर्ण देशातील मार्बत मिरवणुकीच्या वेगळेपणासाठी नागपूर हे शहर ओळखलं जातं. चला तर जाणून घेऊया त्याचा इतिहास.
मारबत उत्सव म्हणजे नागपूर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा. नागपूरमध्ये दरवर्षी बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पिवळी व काळी मारबत तसेच बडग्याची भव्य मिरवणूक धूमधडाक्यात काढली जाते. काळ्या मारबतीची सुरूवात १८८० मध्ये, तर पिवळ्या मारबतीची सुरूवात १८८४ मध्ये झाली होती. देशविदेशात चर्चा व वेगळी ओळख मिळालेल्या या उत्सवाला जवळपास १४० वर्षांची परंपरा लाभली आहे. संपूर्ण देशात हा उत्सव फक्त नागपूरातच साजरा केला जातो. कोरोना अपवाद वगळता यात कधीच खंड पडला नाही
अगदी प्लेगची साथ आणि दंगे सुरू असतानाही हा उत्सव कुठल्याही अडथळ्याविना पार पडल्या गेला होता. या अभिनव प्रथेच्या माध्यमातून वर्षभर देशात घडलेल्या चांगल्या-वाईट घटनांवर भाष्य करणारे बडगे तयार केले जातात. या वैशिष्ट्यांमुळे शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या रांज्यांमधून लाखो नागरिक मारबत मिरवणूक बघण्यासाठी आवर्जून येत असतात. आणि या उत्सवाचा आनंद घेतात.
पिवळ्या मारबतीसोबतच काळ्या मारबतीलाही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. श्री देवस्थान पंच कमिटीतर्फे गेल्या १३५ वर्षांपासून इतवारीस्थित नेहरू पुतळ्यापासून काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते. सगळ्यात पूर्वी अप्पाजी मराठे काळ्या मारबतीचा उत्सव साजरा करत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर इंग्राजांचं राज्य होतं. त्यांच्याकडून होत असलेल्या जुलमी कारनाम्यांनी जनता त्रस्त होती. त्यावेळी भोसले घराण्यातील बकाबाईने इंग्रजांशी हातमिळणी केली. त्याचा निषेध करण्यासाठी १८८१ पासून काळी मारबत मिरवणूक काढण्यात येत आहे. नेहरू पुतळ्याजवळील हनुमान मंदिरात ही काळी मारबत आहे
ब्रिटीश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. परकीय गुलामगिरीचे पाश तुटून देश स्वतंत्र व्हावा, या भावनेने १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणेतेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. ती परंपरा आजही सुरू आहे. या परंपरेला नागपूर शहरात विशेष महत्व आहे.