मुंबई (Mumbai) २५ जुलै :- राज्यभरात मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. मराठवाडा, विदर्भ, कोकण, मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोरदार कहर पहायला मिळाला. हवामान विभागाने पुढील ४८ तासांत पावसाचा जोर अधिक वाढेल असा इशारा दिला होता.
गेल्या ४८ तासांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंधेरी तसेच नवीन मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा मोठा फटका रेल्वेला बसला. मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
दरम्यान, मुंबईसह पुण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेनला देखील बसला. मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस उशिराने धावली.
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने सखल भागात पाणी साचले अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, मालाड, बोरिवली या भागात पावसाचं पाणी साचल आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी समवेत दोन फुटापर्यंत पाणी भरले. त्यामुळे पोलिसांकडून अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. भारतीय हवामान खात्याकडून मुंबईसह ठाणे रायगड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला.
मुंबईमध्ये मागील २४ तासांपासून पावसाने हाहाकार माजला आहे. त्यामुळे आता मुंबईतील गांधी मार्केट तसेच किंग सर्कल परिसरात पावसाचे पाणी साचले.
पुणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील शाळाही बंद ठेवण्याचे आदेश दिले. घाटमाथ्यांवरील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शाळांनाही सुट्टी देण्यात आली. लोणावळ्यातही पावसाने तुफान बॅटिंग केली होती आणि सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कायम दिसला. हवामान विभागाने रेड अलर्ट दिला.
सावित्री, कुंडलिका आणि अंबा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. ग्रामीण भागात पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. पालघरच्या वाडा विक्रमगड भागातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली.
कर्जत परिसरात संततधार पावसामुळे उल्हास नदी तुडूंब भरून वाहत होती. सखल भागात पाणी साचल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. प्रशासनाने परिस्थितीची दखल घेऊन सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश दिले. बीड खांडपे, कोंडीवडे सालपे, नेरळ दहिवली, अंथरट वरेडी, वावे बेंडसे आदी गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली.सातारा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, ठाणे, पालघर या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला. रत्नागिरीमध्येही जोरदार पाऊस पडत असून जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. संपूर्ण राज्यभरात पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.