Monday, June 23, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

मोर्शी वरूड तालुक्यातील अटल भूजल योजनेतील कामे निकृष्ट दर्जाची

अमरावती: अमरावती जिल्ह्यात अनेक वर्षापासून ड्राय झोन असलेला मोर्शी, वरूड, चांदुर बाजार तालुका अटल भूजल योजनेत समाविष्ट असून या तिन्ही तालुक्यातील २१७ गावातील अटल भूजल योजना फक्त गावाच्या वेशीवरील बोर्डावरच दिसून येत आहे. खरतर या योजनेंतर्गत गाळ काढणे, रिचार्ज शाफ्ट तसेच बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती करणे, पर्जन्यमापक यंत्र बसविणे, पाण्याची पातळी मोजण्यासाठी पिजोमिटर बसविणे, नाला खोलीकरण करणे, बंधारे दुरुस्ती करणे यासह विविध प्रकारची जल संधारणाची कामे अभिसरणातून व लोकांच्या मदतीने केली जातात, अशी अनेक कामे ड्राय झोन असलेल्या मोर्शी, वरूड तालुक्यात करणे गरजेचे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी अटल भूजल योजनेत सहभागी असलेल्या काही गावातील रिचार्ज शाफ्ट कामाची पाहणी करून त्याची मोजणी केली असता ते फक्त १३ ते ५० फुटापर्यंत केलेले आढळले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, याकडे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा लक्ष देत नसून जी कामे केली जात आहेत. ते निकृष्ट दर्जाची असल्याने या शेतकरी हिताच्या अटल भूजल योजनेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे. अटल भूजल, जल युक्त शिवार योजना ठेकेदार समृद्ध करण्यासाठी की ड्राय झोन दुष्काळ मुक्त करण्यासाठी आहे, असा सवाल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोर्शी, वरूड, चांदुरबाजार तालुका हा कायम दुष्काळीच ठेवायचा आहे काय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी उपस्थित केला असून मोर्शी वरूड तालुक्यातील अटल भूजल योजनेमध्ये सहभागी असलेल्या गावातील संपूर्ण कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटिल, आ. यशोमती ठाकूर, आ. बच्चू कडू, आ. देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे. कायम दुष्काळी म्हणून उल्लेख असलेल्या मोर्शी, वरूड, तालुक्यात या योजनेचा बट्याबोळ होत असल्याचे चित्र निर्माण होतांना दिसत आहे. अटल भूजल योजने सहभागी असलेल्या ग्रामपंचायतीला रिचार्ज शाफ्ट तयार करण्यासाठी, नाला खोलीकरण करण्यासाठी, बंधारे दुरुस्ती करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून कामे करण्यात आली. परंतु ती कामे एमबी प्रमाणे व चांगल्या दर्जाची नाहीत अशी तक्रार नागरिक करीत आहेत. तसेच ते एम. बी प्रमाणे मोजमाप करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली असून त्यांच्या मागणीची दखल घेऊन भुजल विभागाचे अधिकारी या सर्व कामाची पाहणी करून कंत्राटदारांवर व दोषी अधिकाऱ्यांवर काय कार्यवाही करणार याकडे अटल भूजल योजनेमध्ये सहभागी असलेल्या गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

भुजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांद्वारे तसेच जल संधारण व कृषी विभागाकडील सूक्ष्म सिंचनाच्या उपाययोजनांद्वारे भुजल पातळीमध्ये सुधारणा करणे हा अटल भूजल योजनेचा मुख्य हेतू आहे. पाण्याच्या अनियमित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे अटल भूजल योजना पांढरा हत्ती ठरत असल्याचे चित्र ड्राय झोन असलेल्या मोर्शी, वरूड तालुक्यात दिसत आहे.

– रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles