मोदीजी आता कांद्यावर बोला
मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिक आणि दिंडोरीतील महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा पार पडली. या सभेत मोदींच्या भाषणाला सुरुवात झाली भाषण लयीत आल्यानंतर अचानक मोदी भाषण करताना थांबले.अनेकांना नेमकं काय झालं हे कळालं नाही. पण प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांनी “मोदीजी आता कांद्यावर बोला” अशी घोषणाबाजी सुरु केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली त्यानंतर लगेचच मोदींचं भाषण पुन्हा सुरु झालं.नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरीचे उमेदवार भारती पवार आणि धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ दिंडोरीतील पिंपळगाव बसवंत इथं सभा पार पडली. यावेळी मोदींनी नेहमीप्रमाण मराठीतून भाषणाला सुरुवात केली. यावेळी प्रेक्षकांमधून मोदी-मोदी अशी घोषणाबाजी सुरु होती. त्यामुळं मोदी देखील उत्साहात भाषण करु लागले.
नेहमीप्रमाणं काँग्रेस, इंडिया आघाडी, राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यानंतर अल्पसंख्यांच्या मुद्द्यावर ते आले पण अचानक प्रेक्षकांमधून “मोदीजी आता कांद्यावर बोला” अशी घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर लक्ष विचलित झाल्यानंतर मोदी क्षणभर थांबले. मोदी भाषण करताना मध्येच थांबल्यानं प्रेक्षकांमध्ये चुळबूळ निर्माण झाली आणि सर्वांची डोकी घोषणाबाजी होणाऱ्या दिशेला वळली. त्यानंतर मोदींच्या पाठीराख्यांनी मोदी-मोदी अशी घोषणाबाजी सुरु केली.
दरम्यान, मोदींनी जय श्रीराम….जय श्रीराम असा नारा देत प्रेक्षकांना प्रत्साहित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. पुढे त्यांनी आपल्या योजनांची माहिती द्यायला सुरुवात केली आणि शेवटी ते त्यांनी आपण कांदा उत्पादकांसाठी काय काय केलं याचा पाढा वाचला. पण तरीही प्रेक्षकांमधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी सुरुच होती. त्यामुळं अखेर मोदींनी इतर सभांपेक्षा कमी वेळेत आपलं भाषण उरकलं.दरम्यान, रोहित पवारांनी काही तासांपूर्वी ट्विट करुन सांगितलं होतं की, “मोदींची नाशिकमध्ये सभा होणार आहे म्हणून कांदा उत्पादकांना नोटीसा दिल्या जात आहेत. काहींना तर ताब्यातही घेण्यात आलं आहे. निर्वीवाद सत्ता उपभोगणाऱ्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले असते तर कदाचित हि वेळ आली नसती.
शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्यामध्ये हिंमत आणि शेतकऱ्याबद्दल कळवला असेल तर कांद्याची माळ घालून मोदींचं स्वागत करावं गरज पडली तर प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते मोदींचं स्वागत करावं. राज्यातले नेते फुसके बार असले तरी, मोदी साहेबांची कांद्याच्या प्रश्नापासून दूर पळण्याची इच्छा असली तरी महाराष्ट्रातला उध्वस्त झालेला शेतकरी बघून मोदी साहेबांचा टेलेप्रोम्प्टर तरी कांद्याबद्दल एखादा शब्द बोलेल ही अपेक्षा आहे”