लग्नाळूंची झोप उडवणारी सिमरन अखेर जेरबंद
तुम्ही लग्नाळू असाल आणि वधू शोधत असाल तर ही बातमी वाचून मगच पुढचं पाऊल टाका. नाही तर सातफेरे तर घ्याल, मग नंतर घेरी आल्या वाचून राहणार नाही. कारणही तसंच घडलंय. लग्नाळू तरुणांशी लग्न करून लाखो रुपये उकळणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केलीय. नगरमध्येच ही घटना घडलीय. सिमरन नावाची तरुणी हा कारनामा करायची. तिने आठ महिन्यात एक दोन नव्हे तर तब्बल 9 तरुणांशी विवाह केला. तिची चौकशी केल्यानंतर जेव्हा ही माहिती समोर आली तेव्हा सर्वांचीच झोप उडाली.
लग्नाळू तरुण हेरून फसवणूक करणाऱ्या टोळीला अहमदनगरच्या श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केलंय. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील एका तरुणाकडून 2 लाख 15 हजार रुपये घेत त्याचे सिमरन गौतम पाटील हिच्याशी लग्न लावून देण्यात आले होते. लग्नाच्या दोन दिवसांनंतरच नवरीने तिच्या साथीदारासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सिमरनसह तिच्या साथीदारांना अटक केली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या सिमरनने 8 महिन्यांत तब्बल 9 तरुणांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांना चुना लावल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
आणखी दोघे शिकार होता होता वाचले
पोलिसांनी नवरीची भूमिका निभावणाऱ्या सिमरन गौतम पाटील हिच्यासह तिची आई आणि इतर पाच अशा एकूण सात आरोपींना गजाआड केले आहे. शाहरुख शेख फरीद, दीपक पांडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील ऊर्फ कर्णन गौतम पाटील, सचिन बलदेव राठोड ऊर्फ राज रामराव राठोड आणि युवराज जाधव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस तपासात या टोळीचे अनेक कारनामे समोर आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सिमरन हिने तिची आई आणि इतर पाच साथीदारांसह गुजरात, मध्य प्रदेश, हैदराबाद, मुंबई आदी ठिकाणी लग्नाळू मुलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठमोठ्या रकमा घेऊन त्यांची फसवणूक केली.