मणिपूर (Manipur) :- मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार भडकल्याची घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये मंगळवारी दोन गटांमध्ये गोळीबार झाला. जाळपोळ आणि गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय भाजपच्या युवा नेत्यासह पाच जण या हिंसाचारात जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी ३ मेपासून राज्यात हिंसाचार उसळला आहे. इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कौत्रुक गावात गोळीबार झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. किमान एक व्यक्ती बेपत्ता असल्याचीही माहिती आहे. या हिंसाचारात भाजपच्या युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मनोहरमायुम बारीश शर्मा गोळीबारात जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या जवळपास वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तेथे कायम तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर तेथील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आणि पूर्वपदावर येत आहे. मात्र, असं असतानाच आता पुन्हा मणिपूरमधील पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात हिंसाचार उसळल्याची माहिती समोर आली आहे. या हिंसाचारात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण जखमी झाले आहेत.