पावसात होते नागरिकांची तारांबळ
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुकास्तरीय नोंदणी व मुद्रांक विभाग आणि दुय्यम निबंधक वर्ग २ यांच्या कार्यालयात रजिस्ट्री आणि अन्य व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या कार्यालयात नागरिकांना बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यात अचानक पाऊस आल्यास नागरिकांना भिजून त्रस्त व्हावे लागत आहे.
दिवसभरात कोट्यवधीचे व्यवहार करणाऱ्या या कार्यालयात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची, बसण्याची आणि ऊन-पाऊस यापासून बचाव करण्यासाठी छताचीही सुविधा उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याव्यतिरिक्त, नागरिकांकडून सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये छोट्या-मोठ्या त्रुटी काढून त्यांना परत पाठवण्यात येते आणि नंतर त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करून त्रुटी असताना देखील अनेकांची रजिस्ट्री करून देण्याचे काम या माध्यमातून छुप्या पद्धतीने होत असल्याचे सर्वश्रुत आहेत.याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने त्वरित या समस्यांचे निराकरण करावे आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.