सहा महिन्यांचा कार्यकाळ न्यायमूर्ती
संजीव खन्ना (Sanjeev Khanna) हे देशाचे ५१ वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ दिली. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले. विशेष म्हणजे न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ केवळ 6 महिन्यांचा असेल. 64 वर्षीय न्यायमूर्ती खन्ना 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती खन्ना यांनी ६५ निवाडे लिहिले आहेत. या कालावधीत ते सुमारे 275 खंडपीठांचा भाग राहिले आहेत. न्यायमूर्ती (Justice) संजीव यांचे काका न्यायमूर्ती हंसराज खन्ना हे सुप्रीम कोर्टात न्यायाधीश होते. मात्र, ज्येष्ठ असूनही इंदिरा सरकारच्या आणीबाणीला विरोध केल्यामुळे त्यांना सरन्यायाधीश करण्यात आले नाही. त्यांच्या जागी न्यायमूर्ती एमएच बेग यांना सरन्यायाधीश बनवण्यात आले. याच्या निषेधार्थ न्यायमूर्ती हंसराज यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाचा राजीनामा दिला होता
नवनियुक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत. त्यांनीच दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी जामीन मंजूर केला होता. मनीष सिसोदिया यांनादेखील त्यांच्या आदेशानुसार जामीन देण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान 26 एप्रिल रोजी त्यांनी VVPAT आणि EVM यांच्यातील मतांची 100 टक्के जुळवाजुळव करण्याची मागणी फेटाळून लावली. नवनियुक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनीच इलेक्टोरल बाँण्ड असंवैधानिक असल्याचा निर्णय दिला होता. त्यांनीच मुख्य न्यायाधीश कार्यालयाला माहिती अधिकारात आणण्याचा निर्णय दिला होता.
दरम्यान, देशाचे 50 वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या खटल्यांत ऐतिहासिक निर्णय दिले महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तसेच शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातील लढ्याची सुनावणी त्यांच्यापुढेच होत होती. मात्र आता ते निवृत्त झाल्यानंतर नव्या सरन्यायाधीशांपुढे या प्रकरणांची सुनावणी होण्याची शक्यता आहे.